<div class="paragraphs"><p>Nana Patole</p></div>

Nana Patole

 

Sarkarnama

विश्लेषण

नाना पटोलेंसाठी डिसेंबर 2021 अडचणींचा : राहुल गांधींना काय उत्तर देणार?

ज्ञानेश सावंत

मुंबई : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासाठी डिसेंबर 2021 हा महिना राजकीयदृष्ट्या काही चांगला गेला नाही. नागपूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काॅंग्रेसचा उमेदवार अचानाक बदलावा लागला, त्यांच्या भंडाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. यावर कडी म्हणून विधानसभा अध्यक्षपदी काॅंग्रेसचा नेता त्यांना विराजमान करता आला नाही.

विधानसभा अध्यक्षपदाच्या घडामोडींचे पडसाद काॅंग्रेस वर्तुळात उमटले. ही निवडणूक घेण्याचा आदेश न पाळल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेशच्या नेत्यांवर डोळे वटारले असून, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या शब्दाला किंमतच नाही का, अशी विचारणा आता नेत्यांकडे होऊ लागल्याचे सांगण्यात आले. विधान निवडणुकीची तीनदा तयारी करूनही ती न घेतल्याने प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींना खुलासाही करावा लागणार आहे. या साऱ्या घडामोडींचे खापर नानांच्या डोक्यावर फोडण्याचे डावपेच काॅंग्रेसमध्ये रंगले नाही तरच नवल. नानांना मंत्री व्हायचे आहे. त्यासाठी त्यांना एका विद्यमान मंत्र्यालाच विधानसभा अध्यक्षपदी बसवायचे आहे. अध्यक्षदासाठी अद्याप कोणी मंत्री तयार झाला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळातील जागाही रिक्त झाली नसल्याने नानांनाही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात रस नव्हता, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

या सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला असलेले विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ते भरण्याचा निर्णय घेऊन तसे आदेशही देण्यात आले होते. मात्र, पहिल्यांदा कोरोना आणि राज्यपालांच्या आक्षेपाचे कारण देत, ही निवडणूक टाळण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. सरकारमधील काँग्रेसचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना जाणीवपूर्वक काँग्रेसला डावलत असल्याने निवडणूक होत नसल्याचेही कारण सांगण्यात येत आहे.

या अधिवेशनात निवडणूक घेण्याचा आदेश काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देऊनही ती झाली नाही. त्यावरून पक्षश्रेष्ठी प्रदेश नेत्यांच्या नेतृत्वासह सरकारमधील काँग्रेसच्या स्थानाबाबतही साशंक झाल्याचे एका नेत्याने सांगितले. सत्ता असली तरी, पक्षीय अजेंडा बाजूला जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांकडून होतात, तरीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेस कमी पडत असल्याकडे लक्ष वेधून वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली आहे.


अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक घ्या
राज्याच्या २८ फेब्रुवारीला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारने स्पष्ट केले आहे. तरीही, या अधिवेशनात धोका पत्करण्याची काँग्रेसची तयारी नसेल; त्यामुळेच अधिवेशनाच्या पहिल्या- दुसऱ्या दिवशीच अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असे फर्मानच आताच दिल्लीतून आले आहे. पहिल्या दोन दिवसांत निवडणूक न झाल्यास ती टाळण्याचा अनुभव असल्याने वरिष्ठांनी खबरदारी घेण्याची भूमिका घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT