Eknath Shinde News Sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde : ठाकरेंना डिवचत एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

Sachin Waghmare

Mumbai News : आझाद मैदानातील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. त्यासोबतच हिंदू अस्मितेवर भर दिला आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत सरकार प्रभावीपणे करीत असलेल्या कामगिरीचा उल्लेख करीत विरोधकांकडून केले जात असलेले आरोप फेटाळून लावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट उद्धव ठाकरेंवर तोफ डागत आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा काढत थेट ठाकरेंना फटकारले. दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केवळ अडीच वर्षाच्या कारभारात महाविकास आघाडीमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले. घरी बसून राज्य चालविता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतरच महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावले, असल्याचा गंभीर आरोप यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. (Eknath Shinde News)

या दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांनी आपण केलेल्या बंडाचे समर्थन करताना येत्या काळात आपला निर्धार पक्का असल्याचा संदेश दिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला जागा कमी मिळाल्या आहेत तरी पण या जागा ठाकरे गटाच्या विरोधात निवडून आल्याचे सांगत पक्षातील नेते व कार्यकर्त्याचे मनोबल उंचाविण्याचे काम त्यांनी केले आहे. येत्या काळात सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावर सत्तेत पुन्हा येण्याचा निर्धार व्यक्त करताना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमघ्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्नही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केला.

आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका करताना एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतानाच दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे म्हणाले, दिसेल ते काम ब्रेक लावण्याचे काम महाविकास आघाडीने केले. जिथे नव्हते ब्रोकर तिथे टाकले स्पीड ब्रेकर हेच महाविकास आघाडीचे काम पण आम्ही त्याच सरकारला उखडून टाकले. माझी दाढी खुपते सारखे पण मी सांगतो होती दाढी, म्हणून उद्धवस्त केली महाविकास आघाडी, महाराष्ट्र विरोधी आघाडी. बंड केले नसते तर तर फक्त फेसबूक लाईव्ह झाले असते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या कारभारावर टीका केली.

दिल्लीत जाऊन नेत्यांची मनधरणी करण्याचे काम केले जात आहे. मला मुख्यमंत्री करा पण तुमच्या मित्रपक्षालाच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहेत. कोविड काळात तुम्ही मढ्याचे टाळूवरचे लोणी खाल्ले. तुमच्या तोंडाला लागलेले शेण लपणार नाही. लोक मरत होते आणि तुम्ही पैसे मोजत होतात कुठे फेडणार ही पाप. राज्याच्या निवडणुकीत हरियाणाची पुनरावृत्ती परत झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. केंद्रात कोणताही आम्ही प्रस्ताव पाठवला तर नामंजूर होत नाही. आम्ही दिल्लीत विकासासाठी जातो. मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा, अशी मागणी करायला नाही जात असा टोला शिंदेंनी लगावला.

हरियाणामध्ये भाजपची सत्ता पुन्हा आल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, "हरियाणाच्या लोकांनी विरोधकांना दाखवून दिलं आहे. हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही", असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.

सरकार घालवलं नसतं तर योजना आल्या नसत्या. उद्योग आले नसते. लाडकी बहीण योजना आली नसती. बहिणींना सन्मान मिळाला नसता. तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती. पहिल्या अडीच वर्षात काय झालं माहित आहे. कसं होणार?. कारण त्या अडीच वर्षात महाराष्ट्र विरोधी विकास आघाडी राज्यात सत्तेवर होती. दिसेल ते काम बंद करण्याचं काम केलं. मेट्रो,बुलेट, कारशेड, जलयुक्त शिवार याला ब्रेक लावला. जिथे नव्हता ब्रोकर तिथे टाकले स्पीड ब्रेकर. असं यांचं काम होतं. आम्ही हे स्पीड ब्रेकर उखडून टाकलं. ज्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले ते सरकारच उखडून टाकलं. म्हणून सांगतो मला हलक्यात घेऊ नका, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT