Uddhav Thackeray, Sanjay Rathod, Bhavana Gawali
Uddhav Thackeray, Sanjay Rathod, Bhavana Gawali sarkarnama
विश्लेषण

भावना गवळी अन् संजय राठोडांवर, ठाकरेंनी औषध शोधले; दोन नेते लढवणार खिंड

अमोल जायभाये

Uddhav Thackeray : दिग्रस येथील माजी राज्यमंत्री संजय देशमुख हे गुरुवारी 'मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसैनिक होणार आहेत. दिग्रस मतदारसंघाचे आमदार मंत्री संजय राठोड हे शिंदे गटात गेले. त्यामुळे दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडे राठोड यांना लढत देऊ शकणारा नेता नव्हता.

मात्र, आता देशमुख शिवबंध बांधणार असल्यामुळे दिग्रस मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे. तसेच बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनीही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधले आहे. सुनील महाराज यांचा पक्षातील प्रवेश हा यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातील राजकारण कायमचे बदलणारा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

यात देशमुख आणि सुनील महाराज यांच्या प्रवेशामुळे संजय राठोड (Sanjay Rathod) आणि खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भावना गवळी यांचा लोकसभा मतदार संघ हा वाशिम आणि यवळतमाळ असा दोन जिल्ह्यांचा आहे. या मतदार संघात असलेला बंजारा समाज हा रोठोड आणि गवळी यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, सुनील महाराज यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केल्यामुळे येथील गणित बदलणार आहेत.

सुनील महाराज यांचा प्रवेश हा दिग्रस मतदारसंघातून चारवेळा विधानसभेवर निवडून जाणाऱ्या राठोडांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी महंत सुनील महाराजांना शिवसेनेत आणून राठोड यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. कारण आजपर्यंत दिग्रस मतदारसंघातील बंजारा मते एकगठ्ठा राठोड यांना मिळत होती.

यामध्ये पोहरादेवी येथील महंतांची भूमिका महत्वाची होती. बंजारा समाजावर महंतांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून दिग्रस मतदारसंघात राठोड यांच्याविरोधात सुनील महाराज यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. सुनील महाराज यांना देशमुख यांचेही पाठबळ मिळणार असल्यामुळे राठोडांना निवडणूक जड जाणार, असल्याचे सांगितले जात आहे.

बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे पंचमीच्या यात्रेच्या शुभदिनी मी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मला शिवबंधन बांधले. बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवसेनाच काम करु शकते. ज्यांच्यासोबत आम्ही होतो, त्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मात्र, सारासार विचार करुन मी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. माझ्यासोबत शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करु, असे सुनील महाराज म्हणाले होते.

शिवसेनेत मोठी फुड पडली. त्यामध्ये ४० आमदार आणि १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला. त्यामुळे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी ठाकरे यांनी हालचाली सुरु केल्या. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या आणि खासदारांच्या मतदार संघात त्यांना टक्कर देऊ शकणाऱ्या नेत्यांचा शोध ठाकरेंनी घेतला.

त्याच माध्यमातून त्यांनी माजी आमदार, तसेच इतर पक्षातील तुल्यबळ लढत देऊ शकणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरु केला. त्यानुसार अनेक मतदार संघात त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यामाध्यमातून शिंदे गटातील नेत्यांसमोर आव्हान उभे केले. त्याच प्रमाणे त्यांनी वाशिम आणि यवतमाळमध्ये सुनील महाराज आणि देशमुख यांच्या रुपाने राठोड आणि भावना गवळी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT