Dilip Walse Patil
Dilip Walse Patil sarkarnama
विश्लेषण

दिलीप वळसे पाटील हे मवाळ गृहमंत्री का वाटतात?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांत जे कोणी गृहमंत्री झाले ते आक्रमक बोलणारे होते. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असोत की छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) किंवा आर. आर. पाटील यांच्या भाषणांत आजही आवेश जाणवतो. मुख्यमंत्री आणि गृह खाते अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर त्वेषाने बोलतात, असे वाटत राहते. त्या तुलनेत 2019 मध्ये गृहमंत्री झालेले अनिल देशमुख हे फारच सौम्य होते. त्यांचे भाषेवर प्रभुत्व नसल्याचे जाणवत होते. त्यातून त्यांच्यावर आरोप झाल्याने ते तुरुंगात गेले. त्यांच्या जागेवर आलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे पण मवाळ असल्याचा आरोप होत आहे.

वळसे पाटील हे वकिल आहेत. ते बोलण्यात सौम्य असले तरी राजकीय डावपेचांत तरबेज आहेत. ते कसे डाव टाकतात, हे त्यांच्या आंबेगावमधील विरोधकांकडून समजून घ्यायला हवे. तसेच विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करतानाही त्यांनी आपल्या वकिली बाण्याने अनेक अवघड विषय सोपे करून सोडविले होते. तरीही भाजपचे नेते ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात रोज बोलत असतात त्या तुलनेत वळसे पाटील हे फिके वाटतात. वळसे पाटील यांच्या कारभारावर मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पण खूष नसल्याच्या बातम्या झळकल्या. त्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने खुलासा केला आणि आपला वळसे पाटलांवर विश्वास असल्याचा निर्वाळा दिला.

वळसे पाटील हे मवाळ का वाटतात, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी आज विचारल्यानंतर त्यांनी वकिली बाण्याने उत्तर दिले. मवाळ किंवा कडक भूमिका ठरविण्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की माझ्यासमोर जी वस्तुस्थिती येते, त्यानुसारच कारवाई केली जाईल. कारण कोणतीही कारवाई करताना ती न्यायालयातही टिकायला हवी. न्यायालयाचा त्याला पाठिंबा हवा. त्यामुळे मवाळ राहण्याचा प्रश्नच नाही, जर एखादी गोष्ट चुकली तर त्यावर कारवाई करायला मागे पुढे पाहिले नाही पाहिजे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेहमी भेट होत असते. तशाच प्रकारे आज भेट घेऊन शासनाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबत भेट होण्याआधी काही माध्यमांवर चुकीचे वृत्त प्रसारित झाले होते, त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयानेच स्पष्टीकरण दिले असून माध्यमांनी चालवलेले वृत्त निराधार होते, असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.

नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात गृहखात्यावर घणाघाती चर्चा झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत यांनी आक्रमक हल्ले चढविले. पेन ड्राईव्हचा बाॅम्बही फुटला. पण वळसे पाटील यांनी आक्रास्तळेपणे उत्तर न देता या नेत्यांनाच टोमणे मारत त्यांच्या मुद्यांतील हवा काढल्याचे निरीक्षण त्यांच्या समर्थक आमदाराने नोंदविले. पोलिसांवर झालेल्या आरोपांबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडल्याचे या आमदाराने सांगितले. एकाही पोलिस अधिकाऱ्याला कायदेमंडळाच्या सभागृहात निलंबित करणार नसल्याचे जाहीर करत त्यांनी अनेक आमदारांच्या पोलिसांवरील आरोपांतील हवा काढल्याचेही त्याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT