Amar Kale Sarkarnama
विश्लेषण

Amar Kale : अमर काळे विदर्भात यांच्या 'तुतारी'चे खाते उघडणार का ?

Sunil Balasaheb Dhumal

राजेश चरपे

Nagpur Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांच्या तुतारीवर राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात वर्धा या एकमेव लोकसभा मतदारसंघात लढत आहे. काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या खांद्यावर पवारांनी हात ठेवल्याने तुतारीचे खाते उघडणार का, अशी जोरदार चर्चा वर्धा जिल्ह्यात सुरू आहे.

काँग्रेसच्या एकेकाळच्या दिग्गज नेत्यांच्या वर्धा लोकसभा मतदारसंघ ओळखला जात होता. माजी राज्यपाल, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष स्व. प्रभा राव, माजी केंद्रीयमंत्री स्व. वसंत साठे, दत्ता मेघे या मातब्बर नेत्यांनी वर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे. महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे काँग्रेसचे येथे पाळेमुळे चांगलेच घट्ट झाले होते.

आपल्याला कोणीच पराभूत करू शकत नाही, हा काँग्रेसचा भ्रम कम्युनिस्ट पार्टीचे रामचंद्र घंगारे यांनी तोडला. तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठे यांना पराभूत करून घंगारे संसदेत पोहचले होते. त्यानंतर वसंत साठे यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आली. त्यानंतर वर्धेत काँग्रेसचे पाळेमुळे सैल व्हायला लागली. शरद पवार यांना सोडून ज्येष्ठ नेते दत्ता मेघे काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांचे पुत्र सागर मेघे यांना काँग्रेसने २०१४ मध्ये उमेदवारी दिली. तत्पूर्वी दत्ता मेघे यांचे भाजप विशेषतः केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते.

दत्ता मेघे राष्ट्रवादीत असताना नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सागर मेघे हे भाजपकडून निवडूण आले होते. वडील राष्ट्रवादीत आणि मुलगा भाजपात हे समीकरण त्यावेळी कोणाला पचत नव्हते. याचा त्रास दत्ता मेघे यांना होत होते. हे बघून सागर मेघे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

सागर मेघे काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर कोणाला उमेदवारी द्यावी, यावर भाजपात मोठा खल झाली. शेवटी जातीय समीकरण बघून रामदास तडस यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे तडस हे मेघे यांचेच समर्थक होते. त्यामुळे वर्धेत मिलिजुली कुस्ती होत असल्याची चर्चा होती. भाजपने डमी उमेदवार दिल्याचेही बोलले जात होते. मात्र तडस यांनी इतिहास घडवला. मेघे यांचा सुमारे २ लाख १३ हजारांच्या मताधिक्याने या निवडणुकीत पराभव झाला. मोदी यांच्या लाटेने त्यांना तारले असे सांगण्यात येते. प्रचारादरम्यान अमित शहा यांनी दोन दिवस वर्धेत मुक्काम ठोकला होता. येथून राजकीय चित्र बदल्याचे सांगण्यात येते.

यानंतर दत्ता मेघे यांनी भाजपात प्रवेश केला. सागर मेघे वर्धेतून लढणार आणि तडस हे त्यांच्यासाठी जागा रिकामी करणारे अशी जोरदार चर्चा सुरू झाली. मेघे आणि गडकरी यांचा घरोबा बघता ही चर्चा खरीच होती. मात्र तडस जातीचे कार्ड वापरले आणि पुन्हा उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांना दिल्लीतून पाचारण केले. तडस यांनी तब्बल एक लाख ८७ हजार २२७ मतांनी टोकस यांना धूळ चारली.

तडस यांच्या विरोधात मतदासंघात असलेली नाराजी बघून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीत या जागेवर दावा केला. याकरिता अमरावतीची जागा काँग्रेससाठी सोडली. माजी आमदार अमर काळे यांचे वडील पवारांचे समर्थक होते. त्यामुळे अमर काळे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवार करण्यात. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार आले होते. विदर्भात खाते उघडण्यासाठी वर्धेची जागा पवारांनी हेरली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT