Maharashtra Political Parties Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Political News : इतके सारे होऊनही भाजप पुन्हा पवार, ठाकरे यांचे पक्ष फोडणार? 

अय्यूब कादरी

Mahavikas Aghadi Vs Mahayuti : कोणत्याही निवडणुकीच्या निकालाला अनन्यसाधारण असे महत्व असते. निकालानंतर राज्याच्या, देशाच्या राजकारणाची दिशा ठरत असते. त्यामुळे निकालाच्या तारखेच्या हवाल्याने राजकीय नेते दावे-प्रतिदावे करत असतात. (Maharashtra Political News) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, मतदारांनी आपली साथ सोडू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने असे दावे आणि प्रतिदावे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

येत्या 1 जून रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सत्ता कुणाची येईल, हे त्याच दिवशी स्पष्ट होईल. राज्यात सत्ताधारी महायुतीसमोर महाविकास आघाडीने (MahaVikas Aghadi) तगडे आव्हान निर्माण केले आहे. दोन प्रादेशिक पक्ष फुटून ते भाजपसोबत (BJP) गेल्याने, काँग्रेसचे (Congress) काही बडे नेते भाजपमध्ये गेल्याने महायुतीसाठी ही निवडणूक एकतर्फी होईल, असे वाटत होते, मात्र चित्र तसे दिसत नाही. महायुतीसमोर या निवडणुकीत ज्या कारणामुळे आव्हान निर्माण झाले, त्याचा भाजपच्या काही नेत्यांना विसर पडला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याचे दावे केले जात आहेत. (Latest Political News)

चार जूननंतर भाजपमध्ये फूट पडेल, असा दावा शिवसेनेचे (ठाकरे गट) (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. भाजपच्या दृष्टीने ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे अतिशयोक्तीच होते. कारण राज्यातील दोन पक्ष फोडणाऱ्या भाजपमध्ये फूट पडेल हे त्या पक्षाला आणि समर्थकांनाही पटण्यासारखे नाही. निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्ये केली जातात. मात्र भाजपने ठाकरे यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे मुबंई येथील नेते मोहित कंबोज यांनी आता मोठा दावा केला आहे. 4 जूननंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात पुन्हा फूट पडेल, त्यांचे उर्वरित आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे. पक्षफुटीच्या मुद्द्यावरूनच ही लोकसभा निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक बनली आहे. तरीही भाजप नेत्याकडून पुन्हा असा दावा करण्यात आला आहे. भाजपला विरोध पक्ष नको असतात, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. मोहित कंबोज यांच्या दाव्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. निवडणुकीच्या काळात अशी चर्चा भाजपला निश्चितच परवडणारी नाही.

महाविकास आघाडीचे सरकार पडण्यास शिवसेनेतील फूट कारणीभूत ठरली. त्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले. त्यापूर्वी शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांनी सूरत, गुवाहाटीची सफर केली. त्या काळात 50 खोके एकदम ओके ही घोषणाही त्यांच्यासाठी वापरण्यात आली. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. फुटून बाहेर पडलेल्या दोन्ही पक्षांना मूळ चिन्हे, पक्षाची नावे मिळाली. हे सर्व होत असताना लोकांच्या मनात कोणती भावना निर्माण झाली होती, याचा विचार पक्ष म्हणून भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांनीही केला नाही. आज जे काही आव्हान महायुतीसमोर उभे आहे, ते त्यामुळेच. महाविकास आघाडीला 48 मतदारसंघांत उमेदवार मिळतील की नाही, अशी अवस्था शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे निर्माण झाली होती. आज परिस्थिती तशी दिसत नाही. महाविकास आघाडीने महायुतीला आव्हान दिले आहे. 

 पक्ष फोडण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांचा विरोध होता, असे सांगितले जाते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये घ्या, मात्र पक्ष फोडू नका, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये होता. मात्र, बदल्याची भावना यावर वरचढ ठरली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली. शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी स्थापन झाली आणि सर्वाधिक 105 आमदार निवडून येऊनही भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले. याचा सूड घेण्याच्या उद्देशाने राज्यातील दोन महत्वाचे पक्ष फोडण्यात आले. ही चाल राज्यातील बहुतांश लोकांना आवडलेली नाही, हे अनेकवेळा समोर आले आहे, तसे लोकांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपने फोडली नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात एका प्रचारसभेत सांगावे लागले होते.  

राज्यात लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यांत होत आहे. आता 20 मे रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होईल. अशा परिस्थितीत भाजपचे मोहित कंबोज यांचे हे वक्तव्य आले आहे. त्याचा भाजपला फायदा होईल की नुकसान, हे पाहावे लागेल. पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राज्यात मोठी सहानुभूती मिळाली आहे, हे महायुतीच्या काही नेत्यांनीही मान्य केले आहे. जमिनीवर तसे चित्र दिसतही आहे. अशा परिस्थितीत मोहित कंबोज यांचा अतिउत्साह उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पथ्थ्यावर पडू शकतो.

भाजप हा प्रचंड शक्तिशाली पक्ष आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाजपची देशावर सत्ता आहे. अनेक राज्यांतही भाजप सत्तेत आहे. देशात आणि राज्यात सध्या भाजप इतका शक्तिशाली अन्य कोणताही पक्ष नाही. असे असतानाही भाजपला पुन्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आमदारांची गरज का भासत असावी? प्रचंड शक्ती असताना दाखवलेली शालीनता लोकांना आवडत असते, उद्दामपणा आवडत नसतो. भाजपच्या नेत्यांनी आतातरी हे लक्षात घ्यायला हवे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT