पश्चिम बंगालमधील निवडणुकीला आता वर्षही राहिलेलं नाही. गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भाजपने देशातील प्रत्येक निवडणूक आक्रमक रणनीतीनेच लढवली आहे आणि पश्चिम बंगालही त्याला अपवाद नाही. विशेषत: 2014 पासून भाजपने देशाच्या राजकारणात केंद्र स्थान मिळवल्यापासून प्रत्येक निवडणुकीला राजकीय वर्तुळात आणि विश्लेषकांमध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं दिसतं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना कडवा विरोध करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. 2014 पासूनच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील संघर्ष सतत तीव्र होत गेल्याचं दिसत आहे. गेल्या निवडणुकीनंतर तर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारही झाला होता. ममतादीदींना सत्तेतून बाहेर खेचणे भाजपला अद्याप शक्य झालेलं नाही.
या पार्श्वभूमीवर आता पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच शिक्षक भरतीतील गैरव्यवहाराचं मोठं प्रकरण उघडकीस आल्यामुळे ममता बॅनर्जींची कोंडी झाली आहे. कोलकता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने 25000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठाच गदारोळ सुरु झाला आहे.
तब्बल 25000 कर्मचाऱ्यांना एका झटक्यात नोकरी गमवावी लागल्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसच्या व्होट बँकेवरही होणार, हे नक्की आहे. त्यामुळे या प्रकरणात ममता बॅनर्जीही काहीशा बॅकफूटवर गेल्या आहेत. शिक्षक भरती गैरव्यवहाराची पाळेमुळे सरकारमध्ये खोलवर रुजली असल्याचे निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. त्यातच याच प्रकरणात ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे.
'सर्वसामान्य नागरिकांचा आवाज' अशी ममता बॅनर्जी यांनी स्वत:ची ओळख बनवली आहे. निम्न मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग या दोन्ही प्रकारच्या मतदारांमध्ये ममता बॅनर्जी यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 25000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली असून त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश केल्यास जवळपास एक कोटी लोकांना या गैरव्यवहाराचा फटका बसला आहे.
याकडे केवळ नोकर भरतीतील गैरव्यवहार इतक्याच मर्यादित दृष्टीकोनातून पाहता येणार नाही. ममता बॅनर्जी यांनी इतकी दशके जी आश्वासने दिली होती व पश्चिम बंगालच्या मतदारांना स्वप्ने दाखवली होती, त्याला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधील ग्रामीण भाग आणि उपनगरांमध्ये याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी आर. जी. कार रुग्णालयात झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतरही मध्यमवर्गाला मोठा धक्का बसला होता. आता भरती प्रकरणातील गैरव्यवहारामुळे तृणमूल काँग्रेसचा पाय आणखी खोलात जाणार आहे.
आर. जी. कार रुग्णालयातील सामूहिक बलात्कार, शिक्षक भरती गैरव्यवहार या दोन प्रकरणांमुळे तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 'माँ, माटी, मानूश' या घोषणेचा पुढील निवडणुकीत कितपत फायदा होईल, याबद्दल शंकाच आहे.
2007 मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम प्रकरणांत तेव्हा विरोधात असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आक्रमक आंदोलनं करत संपूर्ण राज्य ढवळून काढलं होतं. पण ममता बॅनर्जी यांच्या सुदैवानं सध्या राज्यात प्रबळ विरोधक नाही. डाव्या पक्षांची शक्ती जवळपास संपली आहे आणि भाजपची संघटनात्मक शक्ती अद्याप दिसलेली नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये नेत्रदीपक यश मिळवले होते. त्या निवडणुकीत बंगालमधून भाजपचे 18 खासदार निवडून आले होते. पण 2024 मध्ये ही संख्या सहानं कमी झाली आणि केवळ 12 जागा जिंकून आल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत सुवेंदू अधिकारी आणि सुकांता मुजुमदार यांनी भरती गैरव्यवहारावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
या मुद्यावरून राज्य सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आता मोदी-शहा यांच्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपची संघटनात्मक शक्ती कितपत प्रत्यक्षात दिसून येतेय, यावर निवडणुकीचं चित्र अवलंबून असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.