martyred colonel santosh babu father says not satisfied over mahavir chakra
martyred colonel santosh babu father says not satisfied over mahavir chakra 
विश्लेषण

गल्वानमधील हुतात्मा कर्नल बाबूंना महावीर चक्र मिळालं अन् वडील म्हणतात, शंभर टक्के समाधानी नाही!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मागील वर्षी भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात संघर्ष झाला. त्यावेळी गल्वान खोऱ्यात गोळीबार न होताही भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. त्यातील कर्नल संतोष बाबू यांना केंद्र सरकारने मरणोत्तर महावीर चक्र जाहीर केले आहे. यावर त्यांच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

गल्वान खोऱ्यात कर्नल संतोष बाबू यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना महावीर चक्र जाहीर झाले आहे. यावर बोलताना त्यांचे वडील बी.उपेंद्र म्हणाले की, मी आनंदी नाही अशी बाब नाही. परंतु, मी शंभर टक्के समाधानी नाही. माझ्या मुलाचा आणखी चांगला सन्मान व्हायला हवा होता. त्याने कर्तव्य बजावताना दाखवलेल्या शौर्याबद्दल त्याला देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान असलेले परमवीर चक्र मिळायला हवे होते. माझ्या मुलाच्या पराक्रमाने अनेक जणांना प्रेरणा मिळाली आहे. यात संरक्षण दलात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. 

माझ्या मुलगा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केवळ हातांनी लढा दिला होता. शत्रूला ठार मारण्यात भारत चीनपेक्षा ताकदवान आहे हे त्यांनी दाखवून दिले, असे बी.उपेंद्र यांनी नमूद केले. कर्नल बाबू हे 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांच्यासह 20 जण गल्वान खोऱ्यात हुतात्मा झाले होते. 

मागील वर्षी पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैन्य पाच आठवड्यांहून अधिक काळ आमनेसामने आलेले होते. यातून तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकान्यांमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेत दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा तोडगा निघाला होता. त्यानुसार 15 जून 2020 रोजी रात्री गल्वान खोऱ्यातून चीनचे सैन्य माघार घेत होते. त्यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये जोरदार जुंपली आणि त्यातूनच दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले होते. 

गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांचे हजारो सैनिक तैनात असून, ते वारंवार आमनेसामने येऊन संघर्ष झाला होता. दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडले होते मात्र, गोळीबार झालेला नव्हता. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे 15 जून 2020 रोजी रात्री चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसान भांडणात झाले.

त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले. यात भारताचे 20 अधिकारी व जवान हुतात्मा झाले तर चीनचेही काही सैनिक मारले गेले होते. महत्वाचे म्हणजे या सर्व भांडणात दोन्ही बाजूंनी गोळीबार झालेला नव्हता.

भारत आणि चीन सीमेवर सुमारे 45 वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना प्रथमच गल्वानमध्ये घडली होती. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले होते. त्याआधी अरुणाचल प्रदेशमध्ये 1975 साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT