Mohan Bhagwat Sarkarnama
विश्लेषण

RSS Chief Mohan Bhagwat : मोहन भागवतांनी भाजपची वाट केली सोपी; ही रणनीती निवडणुकीत कमाल करणार?

Mohan Bhagwat’s Strategic Meeting With Muslim Clerics : सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच दिल्लीत देशभरातील मुस्लिम धर्मगुरू, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुस्लिम समाजातील जवळपास 50 हून अधिक महत्वाचे नेते, कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

Rajanand More

A Shift in RSS and BJP’s Communal Strategy : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशांतील अनेक राज्यांतील भाजपचे अनेक नेते मुस्लिम द्वेषाने जणू पछाडलेले आहेत. ते कोणत्या मुद्द्यात हिंदुत्व शोधतील अन् कोणत्या मुद्द्यावरून आपला मुस्लिम द्वेष जगासमोर आणतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे भाजपची मुस्लिम विरोधी प्रतिमा निर्माण झाल्याचे भानही या नेत्यांना राहिलेले नाही. अर्थात पक्षातील इतर नेत्यांनाही हेच हवंय का, हाही प्रश्नच आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मात्र आपल्या भूमिकेत पध्दतशीरपणे आपल्या भूमिकेत बदल केला जात असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच दिल्लीत देशभरातील मुस्लिम धर्मगुरू, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुस्लिम समाजातील जवळपास 50 हून अधिक महत्वाचे नेते, कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. भागवत हे पहिल्यांदाच एकाचवेळी मुस्लिम समुदायातील लोकांना भेटल्याची चर्चा आहे. हे का घडतंय, नेमका आरएसएसचा यामागचा उद्देश काय आहे, संघ मुस्लिमांच्या एवढ्या जवळ जाण्याचा प्रयत्न काय करत आहे, यामध्ये राजकीय समीकरणांचा विचार केला जातोय का, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ आदी राज्यांतील विधानसभा निवडणूक, 2029 मधील लोकसभा निवडणुकीसाठी तर पाया तयार केला जात नाही ना, भाजपची प्रतिमा बदलण्याचा, ताकद वाढविण्याचा हा प्रयत्न आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

बैठकीनंतर अखिल भारतीय इमाम संघटनेचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांनीही सूचक विधान केले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मगुरूंची पहिल्यांदाच आरएसएसने बैठक घेतल्याचे इलियासी यांनी स्पष्ट केले होते. तर मौलाना अबुल कलमा आझाद यांचे नातू फिरोज बख्त अहमद यांचे विधानही महत्वाचे मानले जात आहे. बैठकीत भाऊबंदकी हा महत्वाचा मुद्दा होता. एक दरी निर्माण करण्याचा प्रय़त्न होत आहे, ती दरी सांधण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही धर्माचा असला तरी भारतीय असल्याचे आरएसएसकडून यापूर्वीही सार्वजनिक व्यासपीठावर सांगण्यात आले होते. मोहन भागवत यांनीही अनेकदा अशी सूचक विधाने केली आहेत.

एकीकडे आरएसएसकडून मुस्लिमांबद्दल अशी भूमिका घेतली जात असताना भाजपमधील काही नेते मात्र उघडपणे त्यांच्याविषयीचा द्वेष जाहीर करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीतही असा प्रचार उघडपणे झाला होता. प्रामुख्याने महाराष्ट्रात लोकसभेत दारूण पराभवानंतर भाजपने व्होट जिहादवर जोर देत आपल्याविरोधात संघटितपणे मुस्लिमांनी मतदान केल्याचे एकप्रकारे कबुल केले होते. भाजपच्या म्हणण्याप्रमाणे हा व्होट जिहाद असेल तर मुस्लिमांच्या मनामध्ये भाजपविषयीचा द्वेष का तयार झाला, याचाही विचार करण्याची गरज आहे. पक्षातील अनेक बोलघेवडे नेते आपल्या जिभेवर मुस्लिम द्वेष घेऊन फिरत असतात. याचा कधी विचार होणार आहे की नाही?

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून हिंदू-मुस्लिम म्हणण्यापेक्षा भाजप-मुस्लिम अशी निर्माण झालेली दरी सांधण्याचाच प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. दिल्लीत झालेली बैठक कुणीच हलक्यात घेणार नाही. त्यातून मुस्लिम समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांतील अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम मते निर्णायक ठरतात. लोकसभा निवडणुकीत ते दिसून आले आहे. प्रामुख्याने गरीब, गरजू मुस्लिम समाज भाजपपासून अजूनही कोसभर दूर आहे. या समाजाला सोबत घेण्यासाठी आरएएसकडून प्रय़त्न सुरू आहेत. त्यासाठी मुस्लिम वस्त्यांमध्ये मिलन कार्यक्रम, सद्भावना भोज, मुस्लिम मोर्चा संवाद असे विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.

मुस्लिमांची लोकसंख्या लक्षणीय असलेल्या राज्यांमध्ये आरएसएस अधिक सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक अशा राज्यांमध्ये मुस्लिम समाजामध्ये पेरणी सुरू आहे. आगामी निवडणुका हे त्यामागचे एक कारण तर असेलच पण २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी खतपाणी घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. त्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनाही वठणीवर आणावे लागणार आहे. अन्यथा भाजप-मुस्लिम दरी अधिकच वाढत जाईल, हे निश्चित.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT