<div class="paragraphs"><p>Nana Patole</p></div>

Nana Patole

 

Sarkarnama 

विश्लेषण

नानांची मंत्रीपदाची इच्छा पूर्ण होईना..अन् विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा घोळ संपेना!

ज्ञानेश सावंत

मुंबई : विधानसभा अध्यक्ष (Maharashtra Assembly speaker) आमचा, तोही याच अधिवेशनात निवडण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. विशेषत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Nana Patole) ऊर्जामंत्री नितीन राऊत, (Nitin Raut) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांमधील अडवाअडवीच्या स्पर्धेतच अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी राहिल्याची चर्चा आहे.

वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेऊन मंत्री होण्यासाठी अडून बसलेले नाना हेच निवडणुकीसाठी फारसे उत्सुक नसल्याचेही कारण ही निवडणूक न होण्यामागे आहे. दिल्लीत जाऊन काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटी मंत्री नितीन राऊत, के. सी पाडवी यांनी घेतल्या होत्या. त्या वेळी विधानसभा अध्यक्षपदासाठी कोणीतरी एकाने मंत्रीपदाचा `त्याग` करावा, यासाठी त्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. पण हे मंत्रीही कसलेले असल्याने ते नानांवर भारी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित मंत्री, नेते हे स्व:पक्षातील तमाशा पाहण्याच्याच 'मूड'मध्ये कायम राहिले. त्यामुळे राज्यपालांच्या आक्षेपांपेक्षा पक्षांतर्गतच लाथाळ्यांमुळेच ही निवडणूक घेण्यात आणि विधानसभेचा अध्यक्ष करून आपले वर्चस्व राखण्यात काॅंग्रेस नेते कमी पडल्याचे बोलले जात आहे. नाना, राऊत, थोरात आणि दोन्ही चव्हाण यांच्यात समन्वय नसणे हे यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या काळातच नानांची मंत्री होण्याची इच्छा लपून राहिली नसल्याचे दिसून आली. त्यातून राऊत किंवा पाडवी यांचा राजीनामा करून अध्यक्षपदाच्या खुर्चीत या दोघांपैकी एकाला बसविण्याचा नानांचा इरादा होता. त्यासाठी दोनदा दिल्ली दौरा करून नानांनी `फिल्डिंग`ही लावली होती. परंतु, राजीनाम्याचा उपाय वरिष्ठांना पसंत पडला नाही. त्यातून या पदासाठी आमदार संग्राम थोपटेंचे नाव पुढे आले होते. या पदासाठी अर्ज भरण्याचा निरोप येण्याच्या शक्यतेने थोपटेंनी आपला नवा सूट शिवून ठेवल्याची चर्चा होती. त्यातच चव्हाणांचे नाव पुढे आले आणि निवडणुकीला ग्रहणच लागले.

काँग्रेसमध्ये उमेदवाराचा घोळ सुरू असतानाच मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आपापल्याच अजेंड्यावर काम करीत होते. सध्या कामकाज पाहणारे नरहरी झिरवाळ हे सोयीचे असल्याने पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्याची गरज या दोन्ही मित्रपक्षांना वाटली. तोवर राज्यपालांच्या पत्रावरून गोंधळ सुरू झाला. त्यानिमित्ताने पुन्हा राज्यपाल आणि ठाकरे सरकार आमने-सामने आले. त्यातही काँग्रेस शांत राहिली आणि राज्यपालांचा निर्णय आला की उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले. शेवटपर्यंत राज्यपालांनी आवाजी मतदानावरील आपला आक्षेप कायम ठेवला आणि अधिवेशनाला काही तास राहिले असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेत निवडणूक पुढे गेल्याचे स्पष्ट झाले. ही निवडणूक टाळण्यामागे राज्यपाल, विरोधी पक्ष भाजप, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे नव्हे तर काँग्रेस आणि काँग्रेसच तेही नाना, राऊत, थोरात आणि दोन्ही चव्हाण ही मंडळीच असल्याचे लपून राहिलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT