अजित पवारांचा दरारा कमी? – अलीकडील घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते आता त्यांना सल्ले देऊ लागले आहेत, ज्यामुळे त्यांच्या पारंपरिक दबदब्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सूरज चव्हाण वाद – मारहाण प्रकरणानंतर राजीनामा दिलेल्या सूरज चव्हाण यांची पुन्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली, ती अजित पवारांना माहीतच नव्हती, यामुळे संभ्रम वाढला.
तडकाफडकी प्रतिक्रिया – हिंजवडी, पिंपरी-चिंचवड, चाकण आदी ठिकाणी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना थेट सुनावले; पण यामागे पक्षातील बदलती समीकरणेही दिसत आहेत.
सडेतोड बोलणे आणि तडकाफडकी निर्णय हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यांच्यासमोर बोलण्याचे धाडस कार्यकर्त्यांमध्ये होत नव्हते. काही दिवसांतील घटना पाहता कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले की अजित पवारांचा दरारा कमी होत चालला आहे, हे कळायला मार्ग नाही.
काही दिवसांत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी वेगळेच सुरू असल्याचे जाणवत आहे. वरकरणी आलबेल असल्यासारखे वाटत असले, तरी अंतर्गत कुठेतरी कुरघोडीचे राजकारण सुरू आहे का, असा संशय घेण्याला वाव आहे.
छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना लातूर येथे मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाण यांना पक्षाच्या युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले.
त्यानंतर अवघ्या २० दिवसांत सूरज चव्हाण यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदावर वर्णी लागली. मात्र, या नियुक्तीबद्दल माहितीच नसल्याचे अजित पवारांनी सांगितल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
‘चव्हाण यांच्या नियुक्तीविषयी मला माहिती नाही. त्याविषयीच्या बैठकीला मी हजर नव्हतो. मला खटकले, त्याबद्दल मी निर्णय घेतला. मला खटकणाऱ्या गोष्टींवर मी तडकाफडकी निर्णय घेत असतो,’ अजित पवारांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. मात्र, सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत अजित पवारांनाच अंधारात ठेवले होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की ‘सूरज चव्हाण यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. त्या घटनेचा आम्ही सर्वांनीच निषेध केला होता. राष्ट्रीय अध्यक्षांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामाही घेतला होता.
गेली अनेक वर्षे ते पक्षाच्या संघटनेत काम करतात. पक्षाच्या कोअर ग्रुपने प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर विचारपूर्वक दिलेली आहे.’ मात्र, या सर्व घटनेवरून अजित पवार खरोखरच या विषयाबाबत अनभिज्ञ होते की केवळ पक्षाच्या भूमिकेला तडा जाऊ नये आणि मराठा मतदार दुखावला जाऊ नये, यासाठी अजित पवार यांनी हा विषय अंगाला लावून घेतलेला नाही. हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे.
याहीपेक्षा आणखी काही गोष्टी अजित पवार यांच्या कार्यक्रमांमध्ये घडत आहेत. त्याही गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या कामांची पाहणी करण्यासाठी ते पुन्हा हिंजवडीत गेले असता तेथील सरपंच काहीतरी बोलले.
त्यावर, ‘आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचे सगळं आयटी पार्क बाहेर बंगळूर-हैदराबादला चालले आहे. तुम्हाला काही त्याचे पडले नाही,’ असे सांगत अजित पवारांनी सरपंच जांभूळकर यांना खडेबोल सुनावले. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात असताना अद्यापही या कामांमध्ये काही जण येत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली.
अभिनेते व सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शहरातील नदीलगतची आणि दुर्गादेवी टेकडी वरची वृक्षतोड होणार असून, पालकमंत्री म्हणून ही वृक्षतोड थांबवावी, अशी अपेक्षा आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी व्यक्त केले.
मात्र त्यावर हे सगळे ऐकल्यावर अजित पवारांचा स्वर किंचित चिडलेला दिसला. ‘कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो, असे मला वाटायला लागले आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश देतो. सगळा मक्ता मीच घेतलाय, यांनी फक्त उपदेश द्यायचे,’ असा त्रागा त्यांनी केला.
त्यानंतर त्याच दिवशी चाकणच्या तळेगाव आणि आंबेठाण चौकात भेट देऊन वाहतूक कोंडीची त्यांनी पाहणी केली. त्यावेळीही त्यांना एका व्यक्तीने त्यांच्यासमोर आपला मुद्दा मांडत ‘अजितदादा आम्ही पाच वेळा आंदोलन केली आहेत. आमचे जीव जात आहेत,’ अशी तक्रार केली. त्यावरही ‘तुलाच अक्कल आहे का, आम्ही बिनडोक आहोत का, आम्हीसुद्धा आठ वेळा निवडून आलो आहोत. या शहाण्याला काही कळत नाही.
आम्ही आलो नसतो तर काय झाले असते. सकाळी साडेचारला उठून आम्ही कामं केली आहेत. या परिसराच्या विकासासाठी तीनशे-चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. आम्ही अतिक्रमणे काढली तर पुन्हा तुमची नाराजी सोसावी लागते,’ अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील धाराशिव जिल्ह्यातील नेते राहुल मोटे यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत झाला. त्यावेळी एका कार्यकर्त्याने उभे राहून ‘राहुल भैय्यांचे आता तरी काहीतरी चांगले करा, ते तुमच्या हातात आहे,’ असा सल्ला दिला. त्यावर, ‘कोणाचे काय करायचे हे माझ्या हातात आहे. माझं काय करायचे हे आधीसुद्धा माझ्याच हातात होते आणि आतासुद्धा माझ्याच हातात आहे,’ अशी काहीशी मिस्कील टिप्पणी अजित पवारांनी केली.
वास्तविक कार्यकर्त्यांना किंवा अधिकाऱ्यांना तिथल्या तिथे सुनावणे हा अजित पवार यांचा स्वभाव आहे. काही वेळा कार्यकर्त्यांचे कान टोचताना मिस्कील टिप्पणी करून ते हशाही पिकवतात. मात्र, खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना उपदेश किंवा सल्ले देण्याचे प्रकार कधी ऐकिवात नव्हते. त्यांचा तापट स्वभाव पाहता, असे धाडस कोणी करायला धजावत नव्हते. मात्र, काही दिवसांतील घटना पाहता कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले आहे की अजित पवार यांचा पक्षातील दरारा कमी होत चालला आहे, हे कळायला मार्ग नाही.
प्रश्न १: अजित पवारांचा दरारा कमी झाल्याचे का म्हटले जाते?
कारण आता कार्यकर्ते त्यांच्यासमोर थेट सल्ला किंवा टीका करू लागले आहेत.
प्रश्न २: सूरज चव्हाण वादात नेमकं काय झालं?
मारहाण प्रकरणानंतर त्यांचा राजीनामा घेतला, पण लगेचच त्यांची सरचिटणीस पदावर नियुक्ती झाली.
प्रश्न ३: अजित पवार टीकेला कसे प्रतिसाद देतात?
ते थेट, तडकाफडकी बोलतात आणि अनेकदा कठोर शब्दांत सुनावतात.
प्रश्न ४: या घडामोडींमधून काय सूचित होते?
पक्षात अंतर्गत कुरघोडी सुरू असून अजित पवारांचा प्रभाव काहीसा कमी होत आहे, असा अंदाज व्यक्त होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.