Congress
Congress  Sarkaranama
विश्लेषण

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना आणलं अडचणीत; उपोषणाची थेट धमकी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यामुळे विकेट पडली होती. आता सिद्धू यांनी चन्नी यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आपल्याच सरकारविरोधात उपोषण करण्याची जाहीर धमकी दिली आहे.

राज्यातील अमली पदार्थांचा व्यापार आणि गुरु ग्रंथ साहिबचा 2015 मध्ये झालेला अवमान याबाबतचे चौकशी अहवाल जाहीर करावेत, अशी मागणी सिद्धू यांनी केली आहे. राज्यातील अमली पदार्थांच्या व्यापारावर सरकार काहीच कारवाई करीत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. आधी अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्री असतानाही सिद्धू यांनी हाच आरोप केला होता. अखेर पक्षांतर्गत संघर्षामुळे वर्षभराने त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते.

याबाबत बोलताना सिद्धू म्हणाले की, सरकारने अमली पदार्थांच्या व्यापाराबाबतचा चौकशी अहवाल जाहीर न केल्यास मी उपोषणाला बसेन. आधीचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी या अहवालावर काहीच कार्यवाही केली नाही, हे आपण जनतेला दाखवून देण्याची आवश्यकता आहे. आता सरकारने हे अहवाल जाहीर करावेत. हे अहवाल खुले करण्यास सरकारने राज्य सरकारला कोणतीही मनाई केलेली नाही. राज्यातील तपास यंत्रणांनी हा गोपनीय अहवाल उच्च न्यायालयासमोर सादर केला होता.

चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा यांच्यासोबत काँग्रेस हाय कमांडने सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी हे दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.

माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू होता. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली होती. अखेर अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT