Nana Patole and Praful Patel
Nana Patole and Praful Patel  Sarkarnama
विश्लेषण

नाना पटोले यांनी किती वेळा खंजीर खुपसला, याची यादीच राष्ट्रवादीने जाहीर केली...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भंडारा आणि गोंदिया (Bhandra-Gondia Politics) जिल्ह्यातील राजकारणावरून सध्या काॅंग्रेस (Congress) विरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) असा सामना रंगला आहे. गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने खंजीर खुपसल्याचा थेट आरोप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीनेही तीव्र प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार विरुद्ध नाना पटोले असा सामनाही रंगला.

आता त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसने या जिल्ह्यांतील वस्तुस्थिती पुढे आणल्याचा दावा करत काॅंग्रेस आणि भाजप यांची कशी दोस्ती रंगली होती, याचा लेखाजोखा मांडला आहे. नाना पटोले आणि काॅंग्रेसने किती वेळा `खंजीर`खुपसला याची यादीच राष्ट्रवादी काॅंग्रेसने दिली आहे. या साऱ्या वादात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी थेट प्रतिक्रिया दिलेली नसली तरी या पत्रातील माहिती ही त्यांच्याच मुखातून बाहेर आल्याचे स्पष्ट होत आहे.

भंडारा जिल्ह्यात सन २०१० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १४ सदस्य निवडून आले. पण तेंव्हाही काँग्रेस पक्षाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर ठेवून भारतीय जनता पक्षा सोबत सत्ता ग्रहण केली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षाचा असतो यावेळी प्रथम काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपसोबत समझोता करून सत्ता ग्रहण केली व दुसऱ्या अडीच वर्षाच्या टर्मला तत्कालीन काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपशी युती करून आपला विश्वासू चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष बनविले.

२०१५ मध्ये राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे सर्वात जास्त २० सदस्य निवडून आले. काँग्रेस पक्षाचे १६ सदस्य निवडून आले होते. तरी काँग्रेस पक्षाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप सोबत समझोता करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवले.

गोंदिया जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून काँग्रेस पक्षाने आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेच्या बाहेरच ठेवले आहे. यात प्रामुख्याने तत्कालीन आमदार गोपालदास अग्रवाल व आमदार नाना पटोले यांचाच हात राहिलेला आहे. जेंव्हा जेंव्हा या निवडणूका झाल्या तेंव्हा सर्व तक्रारी काँग्रेस नेतृत्वाकडे करण्यात आल्या होत्या. परंतू काँग्रेस पक्षाने कारवाई न करता उलट आमदार गोपालदास अग्रवाल यांना महाराष्ट्र विधान मंडळ लोक लेखा समितीचे अध्यक्ष पद देऊन पुरस्कृत केले. आमदार नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतरही गोंदिया जिल्ह्यात भाजप-काँग्रेस पक्षाची युती कायम होती.

भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सन २०१५ मध्ये आघाडी करून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनविले. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बांधकाम विभाग सभापती पद देण्याचे काँग्रेस पक्षाने मान्य केले होते. पण आमदार नाना पटोले व काँग्रेस पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धोका दिला.

विधान परिषद निवडणुकीत ५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने भाजपचे उमेदवार परिणय फुके यांना मतदान करून त्यांना विजयी केले होते.

६ मे २०२२ रोजी काही पंचायत समिती सभापती निवडणुका संपन्न झाल्या. त्यात काँग्रेस पक्षाने तुमसर पंचायत समितीमध्ये भाजप सोबत युती करून भाजपचे सभापती व काँग्रेसचे उपसभापती निवडून आणले. परंतू या पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रीत येऊन सत्ता स्थापन करू शकत होते.

१० मे २०२२ रोजी भंडारा जिल्हा परिषद निवडणुक पार पडली यामध्येही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपसोबत युती करून काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व भाजपचे संदीप टाले यांना उपाध्यक्ष केले. नुकत्याच झालेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT