Panchayat Samiti Sabhapati Election Sarkarnama
विश्लेषण

Satara Politic's : साताऱ्यात मोठा भाऊ व्हायला निघालेल्या भाजपला राष्ट्रवादीने बरोबरीत रोखले; दोन मंत्री, आमदारांची रसदही कुचकामी

Panchayat Samiti Sabhapati Election 2026 : सातारा जिल्ह्यात भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टक्कर देत रोखले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता समीकरण अद्याप स्पष्ट नसून दोन्ही पक्ष युतीसाठी प्रयत्नशील आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 17 March : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून मोठा भाऊ व्हायला निघालेल्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबरीत रोखले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भाजपने सातारा काबीज करण्यासाठी दोन कॅबिनेट मंत्री, निधीची रास, आमदारांना कामाला लावले, पण संपूर्ण सातारा काही भाजपच्या हाती लागला नाही. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादीकडे भाजप डोळे लावून बसला आहेत, तर पंचायत समितीतही राष्ट्रवादीने भाजपला बरोबरीत रोखले आहे. राष्ट्रवादीचा दावा सहा पंचायत समित्यांचा आहे.

सातारा (Satara) जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती निवडीत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. निंबाळकरांच्या फलटण आणि शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजेंच्या जावळीमध्ये अनपेक्षित बंडाळी आणि धक्क्यांचे राजकारण दिसून आले.

माण पंचायत समितीत चिठ्ठीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) बाजी मारली, त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना आपल्या हक्काच्या मतदारसंघात भाजप सत्तेपासून दूर राहिला आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव आणि माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झाले आहेत. सातारा, जावळी, खटाव, कऱ्हाड आणि फलटणमध्ये भाजपचे (BJP) सभापती झाले आहेत. फलटणमध्ये मात्र निवडीनंतर वाद वाढला आहे. फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला आहे. सभापती शिवांजली भोसले या घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे फलटणमध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता आहे, असा दावा खासदार नितील पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, पाटण पंचायत समितीत मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली सत्ता कायम राहिली आहे. पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती हे शिवसेनेचे झाले आहेत, त्यामुळे शंभूराज देसाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला व्यूहरचना करून रोखण्यात यश मिळविले आहे.

सातारा जिल्ह्यातील अकरा पंचायत समितींपैकी पाचमध्ये घड्याळ, पाचमध्ये कमळ आणि एका पंचायत समितीत शिवसेनेचा बाण अशी सत्ता स्थापन झाली आहे. खंडाळ्यात तब्बल १० वर्षांनंतर राष्ट्रवादीने पुनरागमन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचे जास्तीत जास्त पंचायत समितीत आपल्या विचारांचे सभापती, उपसभापती व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये त्यांना जावळी व फलटणला यश आले. जावळी, माण आणि फलटणमध्ये दोन्ही बाजूंकडून समान संख्या होती. त्यामुळे येथील निवडी चिठ्ठीद्वारे होणार होत्या.चिठ्ठी कोणाला साथ देणार? याची उत्सुकता होती.

फलटणमध्ये फोडाफोडी; दावे प्रतिदावे

फलटणमध्ये सर्वाधिक फोडाफोडीचे राजकारण पहायला मिळाले. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादीच्या शिवांजली भोसले यांच्यासह तीन सदस्यांनी ऐनवेळी भाजपत प्रवेश केला. या नाट्यमय घडामोडींमुळे सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली आणि भाजपने सभापतिपदावर कब्जा मिळवला. येथे उपसभापतिपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाले आहे. दुसरीकडे खासदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीचाच सभापती झाल्याचा दावा केला आहे.

शशिकांत शिंदेंच्या भावजयीची तटस्थता कोणाच्या सांगण्यावरून?

जावळीत सभापती निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या भावजय तटस्थ राहिल्या, त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खबळब उडाली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपचे सौरभ शिंदे तीन मतांनी विजयी झाले. आमदारांच्या घरातूनच झालेल्या या खेळीमुळे जावळीत सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती गेल्या आहेत.

माणमध्ये गोरेंच्या पदरी निराशा

माण पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूने जोरदार प्रयत्न सुरू होते. पण शेवटच्या क्षणी चिठ्ठीने राष्ट्रवादीला कौल दिला. नशिबाची जोरदार साथ मिळाल्यामुळे सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे गेली आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या पदरी या ठिकाणी निराशा पडली आहे.

राष्ट्रवादी-भाजपमध्ये काँटे की टक्कर

राष्ट्रवादी काँग्रेसने वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव आणि माण अशा पाच समित्यांवर आपला झेंडा फडकावला आहे. भाजपला सातारा, खटाव, कऱ्हाड, जावळी आणि फलटण या पाच ठिकाणी यश मिळाले. पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला गड भक्कम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. साताऱ्यावर महायुतीचे वर्चस्व असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या तोंडाला फेस आणला आहे.

भाजपचे स्वप्न अधुरेच

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुती म्हणून एकत्र लढविण्याबाबत भाजपला प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, भाजपने त्याकडे दुर्लक्ष करत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.भाजपचे अनेक नेते आणि मंत्र्यांनी प्रचारात मित्रपक्ष असलेल्या नेत्यांनाच टार्गेट केले होते. पण भाजपचे स्वबळावरील सत्तेच स्वप्न अधुरेच राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT