विश्लेषण

प्रदेश कॉंग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी

संजय मिस्कीन

मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर आता कॉंग्रेसने कात टाकण्यासाठी काही धाडसी निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रदेश जिल्हा व तालुका कार्यकारिणीमध्ये उलथापालथ करण्याचा स्पष्ट इशारा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे. 50 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाच त्यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत केले. 

"टिळक भवन'मध्ये कॉंग्रेसचे जिल्हा स्तरावरील पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. या वेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आक्रमक होऊन काम न करणाऱ्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. 
राज्यात शेतकरी कर्जमाफी, नोटाबंदी यांसारखे सर्वसामान्यांशी संबंधित विषय कॉंग्रेसने हाती घेतले. प्रदेश प्रवक्‍त्यांनी अत्यंत अभ्यासू पद्धतीने सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला; मात्र स्थानिक पातळीवर याबाबत अत्यंत ढिलाई दिसली, असा निष्कर्ष नोंदवत "काम करायचे नसेल तर हरकत नाही, आता 50 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची योग्य वेळ आली असून, लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल' असे चव्हाण म्हणाले.

प्रदेशाध्यक्षपदी चव्हाणच
कॉंग्रेसने नव्याने पक्षबांधणीचा आराखडा तयार केला आहे. 2019 च्या निवडणुकांपर्यंत अशोक चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षबांधणी व बदलाचे सर्वाधिकार चव्हाण यांना देण्यात आले आहे. ज्यांना केवळ पदाची ऊब घ्यायची आहे त्यांना आता पदमुक्त करण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेसच्या विचारांचे नवे चेहरे पक्षात सक्रिय केले जातील, असेही ते या बैठकीत म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT