Ajit Pawar, Eknath shinde, devendra Fadanvis  Sarkarnama
विश्लेषण

Political News : मोदी सरकारची एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्याला का आहे पसंती ?

Sachin Waghmare

loksabha Election : कोणताही घटनात्मक दर्जा नसलेले इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या श्रेणीत मोडणारे उपमुख्यमंत्री पद हे खरेतर राजकीय तडजोड मानले जाते. तरी पण देशातील एक-दोन नव्हे तर 14 राज्यांमध्ये 24 उपमुख्यमंत्री आहेत. अनेक राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री आहेत. ज्यामध्ये आंध्र प्रदेश अव्वल आहे, जिथे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी 5 जणांना उपमुख्यमंत्री केले आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यात प्रत्येकी दोन तर इतर राज्यात प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री आहेत.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने यश मिळवले. त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात सहा जणांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. त्यामुळे या पदाची पुन्हा एकदा जोरात चर्चा सुरु आहे. मोदी सरकारने या तीन राज्यात नेतृत्वात बदल करताना 'महाराष्ट्र पॅटर्न'चा अवलंब केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्री देत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू केली असल्याची चर्चा आहे.

राज्यात एकच सर्वसामान्य नेता असतो. त्याच्या इशाऱ्यावर कारभार केला जातो. मात्र गेल्या काही दिवसापासून प्रबळ सत्ता केंद्र असतानाही बंड रोखण्यासाठी व अनेक नेत्यांना एकाच वेळी खुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीपदाला पर्याय म्हणून उपमुख्यमंत्रीपद शोधले आहे.

जगनमोहन रेड्डी यांचा पाच उपमुख्यमंत्री नेमण्याचा विक्रम

सध्या देशातील 14 राज्यांमध्ये 24 उपमुख्यमंत्री आहेत. त्यापैकी ईशान्य भारतातील सात पैकी चार राज्यात उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. महाराष्ट्र, बिहार व हरियाणात आघाडी सरकार असल्याने तिथे घटक पक्षाला हे पद दिले तर टी केलेली तडजोड समजता येऊ शकते. मात्र अलीकडेच काँग्रेसने कर्नाटकात सिद्धरामया मुख्यमंत्री असताना डी. के. शिवकुमार (d. k. shivkaumar) यांना उपमुख्यमंत्री पद दिले आहे. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी यांनी तब्बल पाच उपमुख्यमंत्री नेमणूक विक्रमच केला आहे.

दोन-दोन उपमुख्यमंत्री देण्याचा पायंडा

या सर्व राज्यांमधील अडचणी वेगळ्या असू शकतात तथापि प्रबळ सत्ता असताना भाजपशासित राज्यांमध्ये उपमुख्यमंत्र्याची वर्णी लावली जात आहे. हा पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा एकाच वेळी अनेकांना सत्तेचा लाभ देण्याचा आणि त्यातून सत्ता बळकट करण्याचा प्रयोग केला असल्याचे दिसते. त्यातही एक दोन नव्हे तर दोन-दोन उपमुख्यमंत्री देण्याचा पायंडा भाजपने पडला आहे.

महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये त्रिकोण

महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये हा त्रिकोण अंमलात आणला आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून पक्षाने बलाढ्य नेत्यांना चकित केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit pawar) यांना उपमुख्यमंत्री केले. उत्तर प्रदेशातही दोन उपमुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला आजमावला आहे. यापूर्वी केशव प्रसाद मौर्य आणि प्रथम दिनेश शर्मा आणि त्यानंतर ब्रिजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री केले आहे.

तीन राज्यात सहा जणांना उपमुख्यमंत्रीपद

आता हाच पॅटर्न मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात सहा जणांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhjnalal Sharma) तर उपमुख्यमंत्री म्हणून दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना संधी दिली आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री म्हणून विष्णूदेव साय तर उपमुख्यमंत्रीपदी अर्जुन साव, विजय शर्मा तर मध्य प्रदेशात मोहन यादव याची नेमणूक मुख्यमंत्रीपदी केली आहे. दुसरीकडे जगदीश देवडा तर राजेंद्र शुक्ला हे उपमुख्यमंत्री असणार आहेत.

उपमुख्यमंत्री पद कॅबिनेट दर्जाचे

1950 मध्ये जेव्हा राज्यघटना स्वीकारली गेली त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे उपपंतप्रधान होते. तेव्हा देशात उपमुख्यमंत्री नसला तरी राज्यघटनेने उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री या पदाला मान्यता दिलेली नाही. ही पदे घटनेत नाहीत. जर आपण घटनेबद्दल बोललो तर हे पद कॅबिनेट दर्जाच्या वरिष्ठ मंत्र्याच्या बरोबरीचे आहे. हे उघड आहे की संविधान या पदाचे स्पष्टीकरण देत नाही किंवा या पदाची कोणतीही तरतूद नाही. पण घटनेच्या मान्यतेनंतर अनेक उपपंतप्रधान आणि उपमुख्यमंत्रीही झाले आहेत.

कोण आहेत देशातील पहिले उपमुख्यमंत्री

1953 मध्ये नीलम संजीव रेड्डी हे आंध्र प्रदेशचे पहिले उपमुख्यमंत्री झाले. इतिहासात ते देशाचे पहिले उपमुख्यमंत्री असावेत. तीन वर्षांनंतर, 1956 मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री करण्यास नकार दिला. नीलम संजीव रेड्डी हे पुढे देशाचे राष्ट्रपती झाले.

महाराष्ट्रातील पहिले उपमुख्यमंत्री कोण

1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. परिणामी जनता पक्षाने 99 जागांसह महाराष्ट्रात यश मिळवलं आणि इंदिरा काँग्रेसला 62, तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या असल्या, तरी रेड्डी काँग्रेसमध्ये असलेल्या वसंतराव नाईकांनी जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंदिरा काँग्रेससोबत हातमिळवणी करीत सत्तास्थापन केली. 7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची, तर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची पहिल्यांदा शपथ घेतली. त्यानंतर जुलै 1978 ते फेब्रुवारी 1980 समाजवादी काँग्रेसचे सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणत्या राज्यात सर्वाधिक उपमुख्यमंत्री

आंध्र प्रदेशात सर्वाधिक पाच उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी 5 उपमुख्यमंत्री केले आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यात प्रत्येकी दोन तर इतर राज्यात प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेश 5, अरुणाचल 1, बिहार 1, दिल्ली 1, हरियाणा 1, महाराष्ट्र 2, मेघालय 1, तेलंगण 1, नागालँड1, त्रिपुरा 1, उत्तर प्रदेश 2, मध्य प्रदेश 2, राजस्थान 2, छत्तीसगड 2.

मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारता येते का?

आघाडी, युती सरकारमध्ये, या पदावर बसलेल्या व्यक्तीला क्रमांक दोनचे मानले जाते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री असताना अध्यक्षस्थान स्वीकारता येत नाही. मुख्यमंत्री नसतील आणि त्या कामासाठी त्यांना अधिकृत केले असेल, तर त्यांना अध्यक्षस्थान स्वीकारता येते. घटनेने कोणालाच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेता येत नाही. त्यांना मंत्रीपदाची शपथ घ्यावी लागते. घटनेत उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेता येत नाही.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT