Narendra Modi
Narendra Modi 
विश्लेषण

लखीमपूर खीरीतील घटनेनंतर मोदी पहिल्यांदाच बोलले...

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मोटारीने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडले होते. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा (Farmers) समावेश होता. मिश्रा यांचा मुलगा आशिष याला या प्रकरणी अटक झाली आहे. अखेर यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ दिवसांनंतर मौन सोडले आहे परंतु, त्यांनी लखीमपूर खीरीचा उल्लेख थेट करणे टाळले आहे.

यातच जगातील सर्व घडामोडींवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखीमपूर खीरीतील घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात एवढा मोठा हिंसाचार होऊनही मोदींनी एकही ट्विट केलेले नाही. लखीमपूर खीरीत चिरडलेल्या शेतकऱ्यांबद्दलही दोन शब्द बोला, अशी मागणी अनेक नेटिझन्सनी मोदींकडे केली आहे. दरम्यान, मोदी हे नुकतेच लखनौमध्ये गेले होते. तेथून केवळ 3 तासांच्या अंतरावर लखीमपूर खीरी आहे. परंतु, मोदींनी लखीमपूर खीरीला भेट तर दिली नाही. याचबरोबर या कार्यक्रमात एकदाही लखीमपूर खीरीतील घटना आणि मृत शेतकऱ्यांबद्दल साधा उल्लेखही मोदींनी केला नव्हता.

मानवाधिकार आयोगाच्या स्थापनादिनी बोलताना मोदींनी लखीमपूर खीरीबाबत भाष्य केले. मात्र, त्यांनी लखीमपूर खीरीचे नाव घेणे टाळले. ते म्हणाले की, देशात मानवी हक्कांबाबत निवडक दृष्टिकोन ठेवला जात आहे. यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. काही जण मानवी हक्क हे राजकीय फायदा आणि तोट्यासाठी वापरत आहेत. यामुळे याचा फटका लोकशाहीला बसत आहे. काही जणांनी काही घटनांमध्येच मानवी हक्कांचे उल्लंघन दिसते. परंतु, इतर घटनांमध्ये त्यांना ते दिसत आहे. मानवी हक्क्यांच्या नावाखाली काही जण देशाला बदनाम करीत आहेत.

लखीमपूर खीरीतील घटनेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. तरीही भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर असलेल्या उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे भाजप नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप प्रवक्त्यांपासून बडे नेते यावर बोलण्यास तयार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी आशिष मिश्राने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले होते. यात 8 जणांचा मृत्यू झाल असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT