Congress
Congress  File Photo
विश्लेषण

अमरिंदरसिंग यांच्यानंतर 24 तासांतच काँग्रेसला बसला दुसरा मोठा धक्का

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपशी (BJP) आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. यावरुन पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याचा विनंती पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदरसिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वाद सुरू होता. सुरवातीपासून दोघांमध्ये समझोता घडवण्याचा प्रयत्न प्रभारी या नात्याने हरीश रावत करीत होते. त्यांना यात यश आले नव्हते. आता अमरिंदरसिंग यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करून सगळ्यांनाच धक्का दिला आहे. याचबरोबर भाजपशी आघाडीचे संकेतही त्यांनी दिले आहेत. कॅप्टन यांनी काँग्रेसला धक्का दिल्यानंतर 24 तासांच्या आता काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे. पंजाबच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती रावत यांनी हाय कमांडकडे केली आहे.

रावत यांनी यासाठी उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीचे कारण दिले आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला आता उत्तराखंडवर लक्ष द्यावे लागणार आहे. निवडणुका जवळ आल्या असून, अतिशय कमी वेळ राहिला आहे. पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पुढील वर्षाच्या सुरवातीला निवडणुका होत आहेत. दोन्हीकडे वेळ देणे मला शक्य नाही. याआधीही ऑगस्ट महिन्यात याबाबत पक्ष नेतृत्वाला विनंती केली होती. त्यामुळे मला आता पक्षाने प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे.

अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रविन ठुकराल यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. अमरिंदरसिंग यांनी अजून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. पण त्यांनी यापूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. ठुकराल यांनी ट्विट करत त्याबाबत स्पष्ट संकेत दिले. 'पंजाबच्या भविष्याची लढाई आता सुरू झाली आहे. पंजाबमधील लोकांच्या सेवेसाठी तसेच मागील वर्षभरापासून आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी माझ्या राजकीय पक्षाची घोषणा लवकरच केली जाईल,' असे ठुकराल या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. पण त्यासाठी एक अट घालण्यात आली आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत तोडगा निघाल्यास भाजपसोबत जागावाटप केले जाईल, असं अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच समविचारी पक्षांशीही आघाडी केली जाईल. त्यामध्ये अकाली दलातून फुटलेले काही गट प्रामुख्याने धिंडसा आणि ब्रम्हपुरा आदी गटांची नावे घेत त्यांनी काँग्रेस व अकाली दलाविरोधात दंड थोपडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT