Rahuri Bypoll 2026 result : राज्य असो किंवा केंद्रातील सत्ता, सत्तेसाठी आणि सत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची हे भाजपला चांगलाच माहिती आहे. त्यामुळे राहुरी आणि बारामतीतील पोटनिवडणूक प्रतीकात्मक असली, तरी भाजप महायुतीने ती मनापासून लढली, हे दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मते आणि मताधिक्यावरून दिसते.
राहुरीची पोटनिवडणूक सोपी नव्हती, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीपूर्वी निर्माण केलेल्या हिंदुत्ववादी वातावरणामुळे, अक्षय कर्डिलेंसमोर आव्हान उभं राहिलं होतं. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी केलेला फोन निवडणुकीत 'टर्निंग पाॅइंट' ठरला अन् अक्षय कर्डिलेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
भाजपचे (BJP) आमदार शिवाजी कर्डिले यांचे आजारपणामुळे निधन झाले. यानंतर तिथं पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीचा चर्चा सुरू झाली. या दोन्ही मतदारसंघात एकाचवेळी आणि देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने मतदानाची घोषणा केली.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत होते. त्यादृष्टिने ते मतदारसंघात सक्रिय झाले होते. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी तयारी सुरू केली.
प्राजक्त तनपुरे यांनी थेट हिंदुत्वाचा मुद्दा घेत, मतदारसंघ पिंजून काढू लागले होते. त्यांना अपेक्षित प्रतिसाद देखील मिळू लागला. नवखे अक्षय कर्डिलेंसमोर एकप्रकारे आव्हानच तयार झाले. प्राजक्त तनपुरे यांनी हिंदुत्वाचा मुद्यावर स्वार झाल्याने, ते भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या.
प्राजक्त तनपुरे यांनी या चर्चा होऊ दिल्या अन् सूचक मौन बाळगणं पसंद केलं. पुढे तनपुरे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे चर्चांना अधिक बळ मिळालं. यातच अक्षय कर्डिलेंना दिल्लीहून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर तनपुरे समर्थकांनी अपक्ष हिंदुत्ववादी आमदार येतोय, असे प्रचार सुरू केला.
अक्षय कर्डिलेंसमोर यातून आणखीच आव्हान सुरू झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तनपुरेंना संपर्क सुरू केले. पण प्रतिसाद नसल्याने दोन एबी फाॅर्म तयार ठेवले. काँग्रेसने राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं.
राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार हेरल्याचे बाळासाहेब थोरात यांनी, अहिल्यानगर शहरात येत जाहीर केलं. पुढे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे स्थानिक नेते रावसाहेब खेवरे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यातून 'मविआ'तील अंतर्गत धुसफूस बाहेर पडली.
प्राजक्त तनपुरे यांनी अक्षय कर्डिले यांच्यासमोर आव्हान उभे केल्याचा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सतावत होता. यातून मार्ग काढण्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, भाजप नेत्यांनी मुहुर्त काढला. अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुरीत दाखल झालेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट प्राजक्त तनपुरे यांचे कार्यालय गाठले.
भाजपच्या याच खेळीनं, इथेच सर्व काही राहुरी पोटनिवडणुकीचं राजकीय गणितं फिरली. चव्हाण आणि विखे पाटील यांनी, तनपुरे यांची बंद दाराआड भेट घेतली. तिथं आगामी राजकारणाच्या दृष्टीने चर्चा झाली. तनपुरेंनी निवडणूक का लढतोय, याचा खुलासा केला. याचवेळी या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राजक्त तनपुरे यांचे दूरध्वनीवरून चर्चा करून दिली.
या दोन्ही नेत्यांबरोबर, राज्याचे भाजपचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. फडणवीसांनी तनपुरे यांची बाजू ऐकून घेतली, थेट मुख्यमंत्री ऐकतात म्हटल्यावर तनपुरेंनी राहुरी अन् मतदारसंघाशी निगडीत असलेल्या आणि भविष्यात राजकीय सोयीच्या ठरतील, असे मुद्दे मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व काही जुळवून आणू, अशी ग्वाही दिली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याने, तनपुरे यांनी एक पाऊल माघार घेण्याचं ठरवलं. प्रमुख पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांशी चर्चा करत, उमेदवारी न करण्याचे जाहीर केलं.
प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णयाच्या स्वागत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीत येऊन केलं. अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराची सांगता सभा राहुरीत झाली होती. त्याचवेळी जाहीर भाषणातून तनपुरेंचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केलं. याच कौतुकाबरोबर प्राजक्त तनपुरे हे मुख्यमंत्र्यांच्या 'गुडबुक'मध्ये केल्याच्या चर्चा आता रंगली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल आला आहे. अक्षय कर्डिले हे मोठ्या मतांनी आणि मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. हा एवढा मोठा विजय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकासाच्या धोरणाचा आहे, अशी प्रतिक्रिया अक्षय कर्डिले यांचे मेहुणे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. या प्रतिक्रियेबरोबरच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राजक्त तनपुरेंना केलेला फोन चर्चेत आला असून, हा निकालाचा आणि अक्षय कर्डिलेंच्या मताधिक्याचा 'टर्निंग पाॅइंट' असल्याचे म्हटलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.