Ramesh Karad, Ajit Gopchde  Srakarnama
विश्लेषण

Ajit Gopchade : रमेश कराडांसाठी आमदारकी सोडणाऱ्या गोपछडेंना मिळाले खासदारकीचे बक्षीस

Sachin Waghmare

Mumbai News : विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी मे २०२० मध्ये निवडणूक पार पडली. या निवडणुकीत उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठा नाराजीचा सूर होता. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावून रमेश कराड यांचा अर्ज कायम ठेवला होता. त्यामुळे नावाची घोषणा होऊनही ऐनवेळी हातातोंडाशी आलेला आमदारकीचा घास पळवल्याची भावना निर्माण झाली होती. दुसरीकडे दोनवेळा आमदारकीची हुलकावणी दिलेल्या रमेश कराड यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. ती गोपछडेची नाराजी दूर करत या निमित्ताने खासदारकीची बक्षिसी दिली आहे.

मे २०२० मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रविण दटके, डॉ. अजित गोपछडे या चार उमेदवारांची विधानपरिषद निवडणुकीसाठी नावे जाहीर केली होती. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे हे चार अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतर भाजपकडून रमेश कराड आणि संदीप लेले यांचे अर्ज दाखल करण्यात आले.

याआधी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांपैकी एखादा अर्ज बाद झाला तर अडचण नको त्यामुळे म्हणून खबरदारी म्हणून दोन अर्ज भरण्यात आले असतील असा अंदाज अनेकांचा होता. लेले आणि कराड यांचे अर्ज डमी असतील, आणि या दोघांचे अर्ज मागे घेतले जातील अशी चर्चा होती.

धक्कातंत्राचा केला अवलंब

त्यावेळी अर्ज छाननीनंतर भाजपने रमेश कराड यांच्याऐवजी दोन अर्ज डमी डॉ. अजित गोपछडे आणि संदीप लेले यांचा अर्ज मागे घेऊन धक्कातंत्राचा अवलंब केला. या धक्कातंत्रामागेही काही कारणे दडलेली होती. त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात भूमिका घेणारे गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी देताना पक्षातील इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांना डावलले होते.

पंकजा मुंडे यांना डावलल्याने त्या स्वत: नाराज होत्याच. मात्र, वंजारी समाजही भाजपवर नाराज झाला होता. त्यामुळे नाराज झालेल्या वंजारी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने वंजारी समाजाचे रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची जोरदार तयारी रमेश कराड यांनी केली होती. मात्र, भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला होता. शिवसेनेची तिथे जराही ताकद नसताना, रमेश कराड यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असताना भाजपने ही जागा सोडल्याने रमेश कराडही तेव्हा नाराज झाले होते.

वंजारी समाजाचा प्राबल्य असलेला मतदारसंघ भाजपने शिवसेनेला सोडला अशी नाराजीची भावना वंजारी समाजात होती. त्यामुळे भाजपने रमेश कराड यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन रमेश कराड (Ramesh Karad) यांची, पंकजा मुंडे (pankaja Munde) यांची आणि वंजारी समाजाची नाराजी काही प्रमाणत दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत नऊच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली व रमेश कराड यांच्या आमदारकीवर शिक्कामोर्तब झाला.

कराडांना मिळाले होते गिफ्ट

२०१८ साली उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर रमेश कराड हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अशोक जगदाळे यांना तयारी करण्यास सांगून ऐनवेळी रमेश कराड यांना भाजपच्या सुरेश धसच्या विरोधात उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी कराड यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत राष्ट्रवादीला अडचणीत आणले होते. त्यावेळी त्यांनी भाजपला पोषक भूमिका घेतली होती. अपक्ष म्हणून अशोक जगदाळे यांची उमेदवारी असल्याने राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्याना पाठींबा दिला होता. त्याचा फायदा भाजपचे उमेदवार धस यांना झाला होता. त्यावेळी कराड यांनी राष्ट्रवादीला चकवा देत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचे बक्षीस म्हणून कराड यांना आमदारकी मिळेल अशी अपेक्षा होती.

SCROLL FOR NEXT