विश्लेषण

महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नका- कदम

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : 105 हुतात्म्यांच्या प्राणांची आहुती देऊन मिळवलेला संयुक्त-अखंड महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नका, उलट कर्नाटकला लागून असलेला मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्राला जोडण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अखंड महाराष्ट्र अखंडच राहिला पाहिजे अशा शब्दांत पर्यावरण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी विदर्भवाद्यांना फटकारले. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात कदम बोलत होते. 


1 मे 1989 साली कामगारांवरील अन्यायाला वाचा फुटली आणि त्यामुळे जगातील 80 देशांमध्ये कामगार दिन साजरा केला जातो असे सांगत कदम यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच या विषयाला हात घालत महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नका असा दम भरला. 
मुख्यमंत्र्यांच्या स्तुतीने भुवया उंचावल्या. 
राज्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम झाला असून त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना धन्यवाद द्यायला पाहिजे असे म्हणत कदमांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. लगोलग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या शिवजलक्रांती योजनेचा उल्लेख करत त्यामुळे देखील जलसाठ्यात वाढ झाल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. कर्जमुक्ती, तूरदाळीसह शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचा प्रश्‍न असो की , हिंदुस्थानी जवानांच्या मृतदेहाच्या विटंबनेचा ताजे प्रकरण या सर्वच बाबींवरून भाजपला ठोकण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्याने भाषणात मुख्यमंत्र्यांचे  चक्क कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT