देशातील एक प्रभावशाली संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) पाहिले जाते. पण देशाचे संविधान, तिंरगा आणि जातीव्यवस्था याबाबत संघाची भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. अनेक वर्षांपासून या विषयावर वाद-विवाद सुरु आहे. या मुद्यांवरुन संघाची भूमिका बदलतांना दिसते. याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये मतभिन्नता आहे.
२७ सप्टेंबर १९२५ रोजी आरएसएसच्या (RSS)स्थापना झाली. तेव्हा ब्रिटिश राजवटीविरुद्ध तीव्र असंतोष होता. देशाच्या स्वातंत्र्य मिळावे, यासाठी अनेक संघटना सक्रिय होत्या. आर्य समाज, हिंदू महासभा, काँग्रेस, क्रांतिकारी संघटना, मुस्लिम लीग, कम्युनिस्ट आदी विविध वैचारिक प्रवाह होते. संघाने स्वातंत्र्यलढ्यात काय भूमिका बजावली? हा प्रश्न संघाच्या स्थापनेपासून नेहमी विचारण्यात येतो, याबाबत राजकीय विश्लेषक दयानंद नेने यांनी 'सरकारनामा'बोलताना सविस्तर माहिती दिली.
हे प्रश्न राजकीय आणि भावनिक दोन्ही स्तरावर महत्त्वाचे आहेत. त्यांच्याकडे पूर्वग्रहांशिवाय आणि तथ्यांच्या आधारे कसे पाहावे, याबाबत नेने म्हणाले, "संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बलिराम हेडगेवार हे मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. कारण त्याकाळात देशामध्ये ब्रिटिश विरोधी आंदोलन काँग्रेस च्या नेतृत्वाखाली लढले जात होते. त्यांनी १९२०च्या असहकार आंदोलनात भाग घेतला होता आणि ब्रिटिशांविरुद्ध उठाव केल्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला होता. त्यांना पुढे जाणवले की, राजकीय स्वातंत्र्य मिळवले तरी समाजाची अंतर्गत एकता, संस्कार आणि राष्ट्रीय चारित्र्य मजबूत नसतील, तर स्वातंत्र्य अपूर्णच राहील. त्यामुळे त्यांनी राजकीय चळवळ सोडून सांस्कृतिक राष्ट्रनिर्मितीचा मार्ग निवडला,"
राजकीय लढ्याने ब्रिटिशांना हटवता येईल; पण समाजातील दुर्बलता, भेदभाव आणि चारित्र्याचा अभाव दूर न करता राष्ट्र खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. त्यामुळे संघाने सुरुवातीपासूनच थेट आंदोलनाऐवजी राष्ट्रनिर्मितीच्या ‘मूलभूत कामावर’ भर दिला आहे आणि नेहमीच स्वतः ला एक सांस्कृतिक संगठन म्हणवले आहे, असे नेने म्हणाले. “राजकीय स्वातंत्र्य हे अंतिम ध्येय नसून समाजशक्ती निर्माण करणे हेच खरे राष्ट्रनिर्मितीचे ध्येय आहे.” अशी संघाची भूमिका होती.
राष्ट्रीय एकतेचा पाया: हिंदू समाजात असलेल्या जाती, प्रांत, भाषा, पंथ यांच्यातील फाटे दूर करून “हिंदू समरसतेचा भाव” वाढवणे.
शिस्त आणि संघटन: दररोजच्या शाखांद्वारे युवकांना शारीरिक, मानसिक, नैतिक आणि सामाजिक प्रशिक्षण देणे.
चारित्र्यनिर्मिती: देशासाठी प्रामाणिक, नि:स्वार्थी, सेवा वृत्तीचे कार्यकर्ते तयार करणे.
स्वदेशी भावनेचा प्रसार: ब्रिटिश वस्तूंवर अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादनांचा प्रचार.
१९२०: असहकार आंदोलनात डॉ. हेडगेवार यांचा सहभाग; तुरुंगवास.
१९३०: नागपूरमधील *सविनय कायदेभंग चळवळी*त त्यांनी स्थानिक युवकांना प्रेरणा दिली. वैयक्तिक पातळीवर सहभागी व्हायला सांगितले.
१९४२: भारत छोडो आंदोलनात संघाने संगठन म्हणून औपचारिक सहभाग घेतला नाही. तेव्हा तेवढी ताकद ही नव्हती. परंतु स्वयंसेवकांनी मदतकार्य, शिस्त राखणे, पोलिस दडपशाहीपासून नागरिकांना वाचवणे अशी कामे केली.
संघाची भूमिका “तटस्थता” नव्हती, तर “राजकारणाच्या पलीकडील राष्ट्रनिर्मिती” अशी होती. त्यांनी “राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा” नव्हे, तर “स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सक्षम समाज” घडवण्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना संघाचे काम अप्रत्यक्षपणे पूरक वाटले, तर काहींनी त्याला राजकीय निष्क्रियता म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.