Shiv Sena, AIADMK Sarkarnama
विश्लेषण

BJP Politics : महाराष्ट्रात शिवसेनेबाबत जे घडलं, तेच अण्णाद्रमुकसोबत होण्याची भीती!

Political Fallout: From Shiv Sena to AIADMK – A Pattern Repeating? : अमित शाह यांच्या उपस्थित अण्णाद्रमुक आणि भाजपच्या आघाडीची नुकतीच घोषणा झाली. यावेळी शहांनी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

Rajanand More

Tamil Nadu Politics : तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकचे प्रमुख के. पलानीस्वामी यांच्या विधानामुळे दक्षिणेकडील या मोठ्या राज्यात खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या पक्षासोबत भाजपची आघाडी झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पलानीस्वामी यांनी ही आघाडी निवडणुकीपुरतीच असल्याचे सांगत आघाडीच्या सरकारमध्ये भाजप नसेल, असे संकेत देणारे विधान केले आहे. यामागची त्यांच्या पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची भीती आता समोर येऊ लागली आहे.

अमित शाह यांच्या उपस्थित अण्णाद्रमुक आणि भाजपच्या आघाडीची नुकतीच घोषणा झाली. यावेळी शहांनी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच अण्णाद्रमुकमध्ये पडसाद उमटण्यास सुरूवात झाली. भाजपबाबत नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. अण्णाद्रमुकला सोबत घेत भाजपकडून आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती नेत्यांना आहे.

भाजप आणि अण्णाद्रमुकची यापूर्वीही युती होती. पण काही ना काही कारणांमुळे बिनसत होते. आताही ही नाराजी समोर येऊ लागली आहे. त्यामुळेच पलानीस्वामी यांना हे विधान करावे लागल्याची चर्चा आहे. विविध मीडिया रिपोर्टनुसार, अण्णाद्रमुकमधील काही नेत्यांकडून आता महाराष्ट्रातील शिवसेना, बिहारमधील नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, कर्नाटकात जेडीएस, अकाली दल आदी पक्षांची उदाहरणे दिली जात आहेत. आपल्यासोबत आघाडी करत भाजप ताकद वाढवून पुढील दहा वर्षांत आपल्याला श्वासही घेऊ देणार नाही, अशी भीती नेत्यांना सतावत आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती करत भाजपने घौडदौड सुरू केली होती. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. आज भाजप महाराष्ट्रातील सर्वात ताकदवान पक्ष असून शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. बिहारमध्येही नितीश कुमार, रामविलास पासवान यांना सोबत घेत भाजपने ताकद वाढवली. आज नितीश कुमारांपेक्षा भाजपचे आमदार जवळपास दुप्पट आहे. आपली स्थितीही अशीच होऊ शकते, असे नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करायला, हे नेते कचरत असल्याची चर्चा आहे.

भाजपला तमिळनाडूत अण्णाद्रमुकशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने एकला चलोचा नारा देत आपली ताकद आजमावून पाहिली. मतांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपचे किती आमदार निवडून येतील, याची गॅरंटी देता येत नाही. त्यासाठी अण्णाद्रमुकला हाताशी धरत किमान शहरी भागांमध्ये आपले स्थान बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

वक्फ विधेयक, शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती, मतदारसंघांची पुनर्रचना आदी मुद्द्यांवरून दक्षिणेकडील राज्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष असल्याचे दिसते. भाजपसोबत आघाडी करून अण्णाद्रमुकनेही हा रोष तर ओढवून घेतला नाही ना, अशीही चर्चा आहे. त्याचा फटका या पक्षाला बसू शकतो. पण भाजपला ही युती गरजेची आहे.

अण्णाद्रमुकचा आधार घेत आपल्याविरोधात रोष कमी करून किमान उल्लेखनीय कामगिरी करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी युतीबाबत काहीही भाष्य केले तरी त्यावर तिखट प्रतिक्रिया द्यायची नाही, असे धोरण भाजपच्या नेत्यांनी स्वीकारलेले दिसते. त्यामुळेच अद्याप पलानीस्वामी यांच्या विधानावर भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT