औरंगाबाद ः ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. जिल्ह्यातील एकूण ६१६ ग्रामपंचायतींपैकी ३६० ठिकाणी शिवसेनेने स्वबळावर बहुमत मिळवल्याचा दावा शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. ७२ ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बहुमत मिळाले असून यामुळे जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचेही दानवे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने जोरदार कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात शिवसेनेला बहुतांश ठिकाणी स्वबळावर बहुमत मिळाले आहे. यात प्रामुख्याने वैजापूर तालुक्यात -७३, पैठण- ७७, सिल्लोड- ६७ जागा, कन्नड, ३९, औरंगाबाद- १५, गंगापूर- ३७, सोयगाव- २८, खुल्ताबाद- ७, तर फुलंब्री तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींवर एकट्या शिवसेनेने स्वबळावर यश संपादन केले आहे.
या निवडणुकीमध्ये शिवसेना नेते पालक मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाठ, मनीषा कायदे, रमेश बोरणारे, उदयसिंह राजपूत जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखाली हा विजय प्राप्त झाला आहे.
तसेच शिवसेनेचे सर्व उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख, पदाधिकारी यांचा देखील या यशात महत्वाचा वाटा असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. या आधी मागील ग्रामपंचायत निवडणुकीत २८७ ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होत्या आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालानुसार शिवसेनेची संख्या ३६० आणि ७२ अशी ४३२ वर गेली असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.