उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस सरकारनामा
विश्लेषण

कमी प्रतीचा गांजा मारल्यामुळेच या कल्पना सुचतात ! फडणवीस-पाटलांना टोमणा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर तोंडसुख घेतलं होते. आज शिवसेनेने (shivsena) चंद्रकांत पाटील (chandrakant patil) व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून तोफ डागली आहे.

''भाजपने महाराष्ट्राची सत्ता गमावून दोन वर्षे झाली. त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवे. जे घडले आहे ते स्वीकारुन पुढे जायला हवे. राजकारणात हे असे चढ-उतार येतच असतात. सत्य स्वीकारले नाही तर निराशेचे आणि वैफल्याचे झटके येतात व लोक अमली पदार्थांच्या आहारी जातात. भाजपचे लोक दसरा मेळाव्यानंतर ज्या बेधुंद पद्धतीने शिमगा करीत आहेत, बेताल आरोप करीत आहेत ते बरे नाही. हे लोक नशेत वगैरे बोलत आहेत काय त्याचा तपास व्हावा, अशी मागणी 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.

”एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात” असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजप पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, त्यामागे लोकमान्यांनी जे ‘गांजापुराण’ सांगितले ते आहे काय? एनसीबीने या सगळ्याचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या ‘भाजपाई’ कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजप नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल,'' असा टोला अग्रलेखात लगावला आहे.

भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर ”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?” अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात

  1. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपला सत्तेचा माज आला आहे. पवार यांनी वैयक्तिक टीका केली नाही. शेतकऱ्यांना ज्या प्रकारे चिरडले गेले त्यावरचा हा संताप आहे

  2. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा उल्लेख ‘एकेरी’ भाषेत करून आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले.

  3. 2024 नंतर देशाच्या राजकारणात बदल होतील तेव्हा ईडी, सीबीआय, एनसीबी त्यांचे ऐकणार नाहीत.

  4. नशेच्या अमलाखाली केलेले वक्तव्य आणि कृत्य लोक गांभीर्याने घेत नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT