मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाने राज्यातील वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांसाठी वीजदरात सरासरी २ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १ एप्रिलपासून नवीन वीजदर लागू होणार आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, टाटा पॉवर वीज वितरण कंपनीच्या विजेच्या दरात वाढ होणार आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठीचे वीज ग्राहकांसाठीचे वीजदर जाहीर केले आहेत. आयोगाने २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत वीजदर आकारणीबाबतचा आदेश जाहीर केला आहे. लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात वीज बिल आल्याच्या ग्राहकांची तक्रारी होत्या. त्यामुळे वीजबिलात सवलत द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
वीज नियामक आयोगाने जाहीर केलेल्या या निर्णयामध्ये दरवाढ केली नसल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयोगाने महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना १ एप्रिल २०२१ पासून वीजबिलात सरासरी १ टक्के कपात केली आहे. त्यामुळे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना वीज वापरासाठी आता प्रत्येक युनिटसाठी ७.५८ रुपये मोजावे लागतील. अदानी कंपनीच्या वीज ग्राहकांसाठी ०.३ टक्के एवढी वाढ लागू होणार आहे. त्यामुळे अदानीच्या ग्राहकांना प्रतियुनिट ६.५३ रुपये मोजावे लागतील. बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी ०.१ टक्के दरवाढ लागू करण्यात आली असून, बेस्टच्या वीज ग्राहकांना युनिटमागे ६.४२ रुपये मोजावे लागतील.
टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी यंदाच्या १ एप्रिलपासून वीज दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना आता प्रति युनिटमागे ५.२२ रुपये मोजावे लागतील. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी ४.३ टक्के दरवाढ करण्यास आयोगाने मंजुरी दिली आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.