Swami Prasad Maurya and Amit Shah
Swami Prasad Maurya and Amit Shah Sarkarnama
विश्लेषण

भाजपचं जहाज बुडणार? कायम जिंकणाऱ्या पक्षात राहणारा नेता पडला बाहेर

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भाजपला (BJP) दोन दिवसांत तीन मंत्री आणि पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज्यात भाजप फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू आहे. ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांच्यापासून ही सुरवात झाली आहे.

स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी 11 जानेवारीला राजीनामा दिला. मौर्य हे कायम जिंकणाऱ्या पक्षात असतात, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याबाबत मौर्य म्हणाले की, भाजपने माझे आभार मानायला हवेत. कारण मी भाजपमध्ये आलो आणि पक्षाचा 14 वर्षांचा वनवास संपला. पक्षाला 2017 मध्ये विजय मिळाला. या विजयाच्या एक वर्ष आधी मी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये आलो होतो.

मी बहुजन समाज पक्ष सोडण्याआधी तो राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. आता हा पक्ष कुठेही दिसत नाही. मी भाजपमध्ये आलो आणि भाजपचा वनवास संपवून हा पक्ष बहुमतासह सत्तेत आला. आता भाजपचा अंत जवळ आला आहे. मी पक्ष सोडल्याने भाजपमध्ये भूकंप आला आहे. उद्या मी पक्षाला आणखी मोठा धक्का देणार आहे. मला मंत्री बनवून भाजपने काही उपकार केले नाहीत. आता भाजपचा शेवट होणार आहे, असे मौर्य यांनी नमूद केले.

मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर चार आमदारांनी पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर 12 जानेवारीला आणखी एक बडे मंत्री दारासिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांनी पक्षावर राजीनामा बॉम्ब टाकला. चौहान हे भाजप ओबीसी मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यानंतर आज मौर्य यांचेच समर्थक आमदार मुकेश वर्मा (Mukesh Verma) यांनीही राजीनामा दिला आहे. यानंतर काही वेळातच मंत्री धरमसिंह सैनी यांनी राजीनामा दिला आहे. सैनी हे आयुषमंत्री होते. भाजपचे आणखी आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. यात मंत्री दारासिंह चौहान, आमदार मुकेश वर्मा आणि मंत्री धरमसिंह सैनी यांची भर पडली आहे. हे आठही जण मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मौर्य यांच्यानंतर इतर नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT