चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरवात झाली आहे. शशिकला या राज्यात आल्यानंतर राज्यात दंगली उसळतील, अशी भीती सत्ताधारी अण्णाद्रमुकला वाटत आहे. यामुळे सरकारमधील काही मंत्री आणि अण्णाद्रमुकच्या मंत्र्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे धाव घेतली आहे. शशिकला आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही. दिनकरन हे हिंसाचार घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर त्या उद्या (ता.8) तमिळनाडूत परतणार आहेत.
सरकारमधील काही मंत्री आणि अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी पोलीस महासंचालक जे.के.त्रिपाठी यांची भेट घेतली आहे. त्यांनी शशिकला आणि दिनकरन यांच्याविरोधात तक्रार केली आहे. हे दोघे राज्यात मोठा हिंसाचार घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी यासाठी मोठा कट आखला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था त्यांना नष्ट करायची आहे. शशिकलांचे काही कार्यकर्ते तर शंभर मानवी बॉम्ब तयार करुन तमिळनाडूत पोचणार आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
यावर पोलीस महासंचालक कार्यालयाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. राज्यातील राजकीय, धार्मिक आणि जातीय समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी पोलीस प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. काही ठराविक राजकीय हेतूने कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील, असे पोलिसांनी म्हटले आहे.
शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.