Mamata Banerjee
Mamata Banerjee  Sarkarnama
विश्लेषण

ममतांच्या दिल्ली दौऱ्याचा मोठा गाजावाजा पण प्रवेश करणारे तिघेही माजी खासदार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या आजपासून दिल्ली दौऱ्यावर असून, त्या मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. काँग्रेसचे (Congress) माजी खासदार किर्ती आझाद (Kirti Azad) व माजी खासदार अशोक तंवर (Ashok Tanwar) आज तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश करणार आहेत. याचबरोबर संयुक्त जनता दलाचे (JDU) माजी सरचिटणीस पवन वर्मा (Pavan Varma) हेसुद्धा तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतरही तृणमूल आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. तृणमूलने राष्ट्रीय पातळीवर आक्रमकपणे विस्तार करण्याचे पाऊल उचलले आहे. काँग्रेसच्या अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना तृणमूल फोडत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आजपासून दिल्ली दौऱ्यावर असून, काँग्रेसला मोठा धक्का देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. तृणमूलने पश्चिम बंगालसह गोवा व त्रिपुरामध्ये काँग्रेसला धक्के दिले आहेत. ममतांकडूनही उघडपणे काँग्रेसवर शरसंधान साधले जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्याकडून भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही केले जात आहे.

ममता या दिल्लीत आल्यानंतर तीन बडे नेते तृणमूलमध्ये दाखल होत आहेत. हे तिघेही माजी खासदार आहेत. यातील किर्ती आझाद हे काँग्रेसचे आहेत तर अशोक तंवर यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. संयुक्त जनला दलाचे माजी सरचिटणीस पवन वर्मा हेसुद्धा राज्यसभेचे माजी खासदार आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश करणार हे तिन्ही नेते माजी खासदार असल्याची बाब ठळकपणे चर्चिली जात आहे.

माजी खासदार किर्ती आझाद हे काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. आझाद हे आधी भाजपमध्ये होते. त्यांना 23 डिसेंबर 2015 रोजी पक्षातून निलंबित केले होते. त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर उघडपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली होती. आझाद यांनी 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकारणातील दुसरी इनिंग सुरू केली होती. ते 2018 मध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. पण पक्षात त्यांना फारसे महत्व राहिले नसल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

अशोक तंवर हे हरियानातील माजी खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसला रामराम केला होता. नंतर त्यांनी अपना भारत मोर्चा हा पक्ष स्थापन केला होता. तंवर हे आधी राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जात. परंतु, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हूडा आणि इतर नेत्यांसोबत मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेस सोडली होती. आता ते तृणमूलसोबत जात आहेत. तंवर हे युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. हरियानातील ते वजनदार नेते असल्याने तृणमूलला तेथे पक्ष विस्तार करण्यास वाव मिळणार आहे. संयुक्त जनता दलाचे माजी सरचिटणीस पवन वर्मा यांना पक्षाने निलंबित केले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे ते सल्लागार होते. तेसुद्धा तृणमूलमध्ये दाखल होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT