Supreme Court Result
Supreme Court Result  Sarkarnama
विश्लेषण

Supreme Court Result : उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरला 'टर्निंग पॉईंट'; 'ती' भीती अखेर खरी ठरली !

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांनी भावनिक होत मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा अखेर शिवसेनेसाठी घातक ठरला आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या विनंतीनंतरही ठाकरेंनी दिलेला राजीनामा हे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील टर्निंग पाईंट ठरला आहे. विशेषतः सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना तुम्ही अगोदरच राजीनामा दिला आहे, त्यामुळे ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी कसे बसविणार, अशी विचारणाही केली होती. (Uddhav Thackeray's resignation became the turning point)

शिवसेनेत बंड झाल्यानंतर प्रयत्न करूनही आमदार परत येत नसल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा तो भावनिक निर्णय होता. ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापासून खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनीही परावृत्त केले हेाते. पवारांकडून तसा निरोपही वारंवार ठाकरेंकडे पोचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ठाकरे राजीनामा देण्यावर ठाम होते.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीच्या अगोदर राजीनामा देणे चुकीचे हेाते, असे म्हटले होते. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही बहुमत चाचणीच्या अगोदर राजीनामा देणे ही चूक हेाती, असे म्हटले होते. त्यामुळे बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच ठाकरे यांनी दिलेला राजीनामा हेच या प्रकरणातील कळीचा मुद्दा ठरला आहे.

शिवसेना आणि ठाकरे यांचे राजकारण हे नेहमीच भावनिक राहिलेले आहे. शिवसेनेतील बंड आणि त्यानंतरच्या परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांनी भावनिक हेातच काही निर्णय घेतले. महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षाकडूनही जाणीव करून देत असतानाही त्याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष उद्धव ठाकरेंना चांगलेच भोवले आहे.

दरम्यान, सुनावणीदरम्यानही ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनीही राज्यपालांचे ते बहुमत चाचणीचे पत्र रद्द करत कोर्टाने पुन्हा जैसे थे परिस्थिती करण्याची मागणी केली होती. मात्र, तुम्ही तर बहुमत चाचणीच्या अगोदरच राजीनामा दिला आहे, असे म्हटले होते. आजही त्यावरच भाष्य करत कोर्टाने उद्धव ठाकरेंचा राजीनामा पुन्हा आधोरेखित केला आहे.

शिंदे गटाने नेमलेले प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. तसेच, राज्यपालांनी घेतलेली भूमिकाही राजकीय प्रेरणेनही प्रेरित होती, असेही म्हटलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट आणि भाजपच्या निर्णयावर ताशेरे ओढलेले असतानाही आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवू शकत नाही. कारण, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे, असेही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT