विश्लेषण

मोहखेडमधल्या जलयुक्त शिवाराच्या कामावरून मुख्यमंत्र्यांवर विखेंची टीका

सरकारनामा ब्युरो

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील मोहखेड येथे जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे कौतुक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वीच जलयुक्तच्या कामामुळे मोहखेड झाले पाणीदार असे ट्‌विट केले होते. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट मोहखेड गाठून जलयुक्त शिवार ऑन द स्पॉट पोस्टमार्टम केले. 

मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही अजून किती खोटं बोलणार, असा टोला लगावत भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा दाखलाच मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात टाकल्याने मुख्यमंत्र्यांचा दावा फोल ठरल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "जलयुक्तच्या कामामुळे मोहखेड शिवार झाले पाणीदार' या आशयाचे ट्‌विट केले होते. त्यानुषंगाने प्रत्यक्षात या ठिकाणी झालेल्या कामांची पाहणणी करण्यासाठी ते बुलडाण्यात जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व शासकीय यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मोहखेड येथील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेल्या कामांमुळे साडेतीन मिटर पाणी पातळी वाढल्याचा दावा केला होता. मात्र, आज भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता दिड मिटरने पाणी पातळी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या गावातील कोरड्या तलावात ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली होती. पाणीटंचाईची भीषण समस्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठ्या आर्विभावात दिवसा-ढवळ्या खोटं बोलत असल्याची टिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT