`शरीर थकलेय, थकू देत; अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत झगडत राहू..'

य झाले, शरीर थकले म्हणून माझे विचार संपणार नाहीत. पूर्ण आयुष्य गोरगरीब, उपेक्षित, ‘नाहिरे’वाल्यासाठी काम केले. पुढेही करत राहू. अन्यायाविरूध्द शेवटपर्यंत झगडत राहू, असा ठाम निर्धार शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी व्यक्त केला.
`शरीर थकलेय, थकू देत; अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत झगडत राहू..'

कंधार, जि.नांदेड : राजकारणातील जातीयकरण, गुन्हेगारीकरण
लोकशाहीसाठी घातक आहे. हा प्रकार आम्ही पूर्वीही सहन केला नाही, आणि पुढेही सहन करणार नाही. आजपर्यंत आम्ही सत्यासाठी स्वाभिमानाचा लढा उभारला. पुढेही यात खंड पडणार नाही. वय झाले, शरीर थकले म्हणून माझे विचार संपणार नाहीत. पूर्ण आयुष्य गोरगरीब, उपेक्षित, ‘नाहिरे’वाल्यासाठी
काम केले. पुढेही करत राहू. अन्यायाविरूध्द शेवटपर्यंत झगडत राहू, असा ठाम निर्धार शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी व्यक्त केला.
         
वयाची तब्बल शंबर वर्षे पूर्ण करणारे केशवराव कदाचित राज्यात आज हयात असलेल्या अत्यंत मोजक्या राजकीय नेत्यांत असतील. ‘मन्याड खोऱ्यातील वाघ’ अशी सार्थ उपमा लाभलेल्या भाईंचा बुधवारी (ता.१७) शंभरावा वाढदिवस होता. १९५७ ते १९९० या काळात भाईंनी आपल्या प्रखर विचारांनी विधिमंडळ हादरवून सोडले होते. सभागृहात त्यांनी भल्याभल्यांना निरुत्तर केले होते. कधी आक्रमक भाषणांतून तर कधी विनोदाची पेरणी करत त्यांनी अनेक प्रश्नांची मांडणी केली व ते प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतला. १९७७ च्या बहुचर्चित
आणीबाणी नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी कॉँग्रेसचे खासदार (कै.) गो.रा.म्हैसेकर यांचा पराभव करून विजय संपादन केला होता. त्यांनी आपल्या मर्दानी व्यक्तिमत्वाची चुणूक लोकसभेतही दाखवून दिली.

सातत्याने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राहूनही त्यांनी कंधार व लोह्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांसाठी शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. कंधारमध्ये विधी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी ऐतिहासिक कार्य केले. ‘देत कसे नाही, द्यावेच लागेल’, ‘हमारा हक्क  देना पडेगा, नही तो जाना पडेगा’, असा एल्गार करून सरकारच्या विरोधात क्रांतीचा नारा बुलंद करीत नेहमी भाईंनी राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी केलेली अनोखी व कल्पक आंदोलने या भागात चांगलीच गाजली. राजकारणात त्यांनी कधीच स्वार्थाचा शिरकाव होऊ दिला नाही.

लालबावटा घेऊन त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती. त्यांनी लाल बावट्याशी कधीच बेईमानी केली नाही. त्यांनी पक्षांतर केले असते तर त्यांना कदाचित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारता आली असती, असा विश्वास त्यांच्याबाबतीत त्यांचे समर्थक आजही व्यक्त करतात. 

दांडगा अभ्यास, चौफेर व्यक्तिमत्व, चाणाक्ष बुद्धिमत्तेचे ते धनी आहेत. तिच्या जोरावर भाईंनी दोन्ही सभागृहे गाजवत कंधारचे नाव राजकीय क्षितीजावर कोरले.

दै. ‘सकाळ’शी बोलतांना त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर चौफेर टीका केली. शंभराव्या वर्षीही त्यांच्यात तोच उत्साह आणि जोश दिसून आला. औरंगाबादला विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त करण्यास ते विसरले नाहीत. जातीयवाद, वर्णवाद, भांडवलशाही यावरही त्यांनी सडेतोड टीका केली. देशाला आज साम्यवाद, मार्क्सवाद, गांधीवादाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. 

‘आता शरीर थकले. थकू दे. माझे विचार थकणार नाहीत. अखेरपर्यंत स्वाभिमानाची पताका तेवत ठेवणार. मुक्ताईच्या आशीर्वादाने उरलेले आयुष्यही लोकांच्या सेवेत समर्पित करणार’, असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com