औरंगाबादः महाराष्ट्रातील जनतेने मला भरभरून दिलं आहे, 1967 पासून चौदा निवडणूक लढलो आणि तुम्ही प्रत्येकवेळी मला निवडून दिलं. राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री झालो. केंद्रात संरक्षण आणि शेती खात्यांचा मंत्री झालो. तुम्ही मला भरभरून दिलं. कशाची कधी कमी पडू दिली नाही ,आणखी मला काय हवं?
म्हणून माझ्या महाराष्ट्रतील शेतकरी, तरूण, विद्यार्थी, कामगार यांच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील, अशी भावनिक साद राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी औरंगाबाद येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उपस्थितांना घातली.
मराठवाडा दौऱ्यातील शेवटचा कार्यकर्ता संवाद मेळावा बीडबायपास रोडवरील सुर्या लॉन येथे आज दुपारी पार पडला.
शरद पवार म्हणाले, केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारला शेतकऱ्यांबद्दल अजिबात आस्था राहिलेली नाही. केंद्राच्या अहवालानूसारच राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. कधीकाळी जगातील 18 देशांना अन्नधान्य पुरवणाऱ्या आपल्या देशातील शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते ही दुर्दैवाची बाब आहे.
आज तरूणांकडे पदवी आहे, पण नोकरी नाही. आर्थिक मंदीमुळे एकट्या नाशिक जिल्ह्यातील हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कधीकाळी मुंबईत 120 कापड गिरण्यांमध्ये 4 लाख कामगार काम करायचे, आज त्यातील फक्त 10 कापड गिरण्या सुरू आहेत.
त्या जागेवर आता मॉल उभे राहिले आहेत. तरुणांच्या हाताला काम दिले नाही, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला नाही, तर शेतकरी आणि राज्यातील तरुणांना ही सत्ता उलथवून टाकायला वेळ लागणार नाही, असा इशारा देखील शरद पवारांनी यावेळी दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.