औरंगाबाद : 'महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, हा कौल दिला होता. भाजपच्या नेतृत्वामध्ये जी महायुती झाली होती, त्याच्याच बाजूने हा कौल होता. पण, शिवसेनेने गद्दारी केली. जनतेच्या कौलाशी शिवसेने विश्वासघात केला' अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी औरंगाबादमध्ये दिली.
राज्यात भाजपच्या सत्ता स्थापनेनंतर ठिकठिकाणी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. आज प्रकाश जावडेकर यांनीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावेळी 'सरकारनामा'शी बोलताना जावडेकर म्हणाले, ''शिवसेनेने गद्दारी केली. शिवाय महाराष्ट्राच्या जनतेनी जो कौल दिला होता, त्याचाही विश्वासघात केला. शिवसेनेने महायुतीचा अनादर करीत काँग्रेसबरोबर जायचे ठरवले. मात्र, जी काँग्रेस रोज सावरकरांना शिव्या घालते, जी काँग्रेस राम मंदिराचा विरोध करते, जी काँग्रेस आणिबाणीचे समर्थन करते, ज्या काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देशाला लुटण्याचे काम केले आहे, आणि ज्या काँग्रेसला जनतेने नाकारले आहे, त्या काँग्रेसबरोबर जाण्याचं महापाप शिवसेनेने केले'',
आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना भाजपला दोष देत आहे, असे सांगताना जावडेकर म्हणाले, ''शिवसेना नेते असे बोलू लागले आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर गेली ते बरोबर आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपसोबत गेले, ते लगेच चूक आहे असे दुहेरी चालणार नाही. वास्तव इतकेच आहे की, शिवसेनेने जनतेशी द्रोह केला आहे. जनादेशाचा द्रोह केला. नरेंद्र मोदींच्या नावे मते मागितली. महायुतीच्या नावे मते मागितली आणि त्याच्या विरुद्ध वागणूक केली. त्यामुळे आज भाजपने सरकार स्थापन केले, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करतो,''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.