हिंगोली : देशात भाजप सरकारने आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न चालवले असून काश्मीरमधील हटवलेले ३७० कलम हा त्याचाच भाग आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (ता.१३) येथे केले.
येथे भाजप उमेदवार आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार तथा उमेदवार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, नगरसेवक गणेश बांगर, दिलीप बांगर, दिवाकर माने, कैलास काबरा, मिलिंद यंबल, उमेश नागरे, हमीद प्यारेवाले, उमेश गुठ्ठे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, काँग्रेस सरकारने काश्मीरमध्ये ३७० कलम लागू केले. काँग्रेस सरकारने विकासाच्या नावावर केवळ स्वतःचा विकास केला आहे. विविध योजनांचा लाभही जनतेला मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला आहे. जनतेच्या विश्वासाच्या बळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील ३७० कलम हटवले. यामुळे आतंकवादाचे उच्चाटन होणार आहे.
राज्यातही मुख्यमंत्री फडणवीस सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. घरकुल योजनेच्या माध्यमातून गरजूंना हक्काचे घरकुल मिळाले आहे. याशिवाय सर्व योजनांचा लाभ गावपातळीवर जनतेला मिळूलागला आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारने राबवलेल्या योजनांच्या बळावरच आपण मतदान मागण्यासाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षाच्या काळात आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे केली आहेत. जनतेने विकासासाठी हिंगोली मतदारसंघातून श्री. मुटकुळे तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.