नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अयोध्या आणि मथुरा या विधानसभा मतदारसंघांकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी सुरक्षित अशा गोरखपूर (शहर) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगींवर डाव टाकला आहे. त्यांनी गोरखपूरमधील विद्यमान आमदारालाच खुली ऑफ दिली आहे.
योगींनी गोरखपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील विद्यमान भाजप आमदार राधामोहन अगरवाल यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे. यामुळे अखिलेश यादवांनी अगरवाल यांना खुली ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पत्रकारांनी अगरवाल यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्याशी बोलावे. त्यांना आम्ही गोरखपूरमधून तिकिट जाहीर करतो. त्यांना हे तिकिट नक्की मिळेल. योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी मला अजूनही आठवतो. अगरवाल यांना बसायला जागा मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना उभेच राहावे लागले होते. भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक अपमानित होणारे अगरवालच आहेत.
भाजपने (BJP) आज उत्तर प्रदेशातील 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात योगी हे गोरखपूर (शहर) मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोरखपूर हा योगींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने सगळ्यांशी विचारविनिमय करून योगींना गोरखपूरमधून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
योगींनी आधी विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी, असा आग्रह होता. मात्र, योगींचा कल अयोध्येकडे होता. मात्र, राज्यातील पूर्व भागातील नेते भाजप सोडून जाण्याचे प्रमाण वाढल्याने नेतृत्वाने योगींनाच गोरखपूरमधून लढवण्याचा निर्णय घेतला. चालू आठवड्यात भाजपचे तीन मंत्र्यांसह 10 आमदार पक्ष सोडून बाहेर पडले आहेत. ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे. राज्यातील बदलती राजकीय समीकरणे पाहता योगींनाच गोरखपूरमधून लढवून भाजप नेतृत्वाने सुरक्षित खेळी खेळल्याचे मानले जात आहे.
योगींनी गोरखपूरमधून लढण्याचे जाहीर केल्यानंतर अखिलेश यादव यांनी निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, आधी भाजपवाले म्हणते होते की योदी अयोध्येतून लढणार. नंतर ते मथुरा अथवा प्रयागराजमधून लढतील, अशी चर्चा सुरू करण्यात आली. आता मुख्यमंत्र्यांनी भाजपने पुन्हा गोरखपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आता तिथेच राहावे. त्यांना पुन्हा इकडे येण्याची कोणतीही गरज नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.