नवी दिल्ली : भाजपचे नेते खासदार वरूण गांधी सातत्याने मोदी सरकारवर ताशेरे ओढत असतात. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अग्निवीर या योजनेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी याच योजनेचा संदर्भ देत अल्पकाळ सेवा करणाऱ्या अग्निवीरांना पेन्शन मिळणार नसेल तर मीही पेन्शन सोडण्यास तयार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. (Varun Gandhi Latest News)
केंद्र सरकारच्या योजनेनुसार अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात चार वर्षांसाठी भरती होणाऱ्या अग्निवीरांना पेन्शन मिळणार नाही. तसेच केवळ चार वर्षे सेवा असल्याने तरूणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यावरून बिहारसह अनेक राज्यांमध्ये आंदोलन पेटले होते.
वरूण गांधी यांनी या आंदोलनानंतर वादात उडी घेतली होती. शुक्रवारी त्यांनी ट्विट करत आता आमदार व खासदारांना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'अल्पकाळ सेवा करणाऱ्या अग्निवीरांना पेन्शनचा हक्क नसेल तर मग लोकप्रतिनिधींना ही सवलत का? देशाचं रक्षण करणाऱ्यांना पेन्शनचा अधिकार नसेल तर मीही स्वत:ची पेन्शन सोडण्यास तयार आहे.
आपण सर्व आमदार आणि खासदार आपली पेन्शन सोडून अग्निवीरांना पेन्शन मिळेल, याची ग्वाही देऊ शकतो का, असा सवाल वरूण गांधी यांनी देशातील सर्व लोकप्रतिनिधींना केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वरूण गांधी योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या तरूणांच्या पाठिशी उभे राहिले होते.
गांधी यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, "मी या संघर्षात प्रत्येक टप्प्यावर लष्करी उमेदवारांच्या पाठीशी उभा आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, संयम बाळगा आणि 'लोकशाही प्रतिष्ठा' जपत विविध माध्यमातून सरकारला आपले निवेदन पाठवा. एक 'सुरक्षित' भविष्य' हा प्रत्येक तरुणाचा हक्क आहे! न्यायाचा विजय होईल.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.