Congress News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरू केलेल्या केंद्र सरकारची मेगा भरती मोहीम म्हणजे 'जुमला किंग'ची 'इव्हेंटबाजी' आहे असा हल्लाबोल करतानाच खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला मिळालेले हे पहिले यश आहे, असा दावा कॉंग्रेसने केला आहे. दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देण्याच्या श्वासनाचीही आठवण कॉंग्रेसने मोदी व त्यांच्या सरकारला करून दिली.
देशातील तरुणांना दिलेले १६ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन कधी पूर्ण करणार, असा सवाल काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेवर आल्यास दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या आठ वर्षांत ते अंशतःही पूर्ण झाले नाही. सुरजेवाला यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो' यात्रेचे पहिले मोठे यश आहे. देशातील विक्रमी बेरोजगारी पहाता ७० हजार नोकऱ्या म्हणजे उंटाच्या तोंडात जिऱ्याचा दाणा असल्यासारख्या आहेत. पण काही का असेना, 'भारत जोडो' यात्रेच्या प्रतिसादानंतर दिल्लीच्या राजाचे 'कान' एकदाचे उघडले आहेत!, असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेचा संदर्भ देत सुरजेवाला म्हणाले, सध्या 'भारत जोडो' यात्रा केवळ चार राज्यांत पोहोचली आणि अखेर 'जुमला राजा' ला बेरोजगारी ही देशाची सर्वात मोठी समस्या आहे, असे मानण्यास राहुल गांधी यांनी भाग पाडले. मात्र, ८ वर्षात १६ कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले? या नोकऱ्या कधी मिळणार हे तारीख-वार-महिना यासह जाहीर करा, असे आवाहन केले.
काँग्रेस मोदी यांना प्रश्न विचारतच राहील असे सांगताना सुरेजावाला म्हणाले, केवळ ७० हजार नियुक्तीपत्रे देऊन परिस्थिती बिलकूव बदलणार नाही. देशातील लाखो तरुणांना रोजगाराची गरज आहे. याचे उत्तर पंतप्रधानांना द्यावे लागेल. राहुल गांधी आणि काँग्रेस हे प्रश्न पंतप्रधानांसमोर सातत्याने मांडत राहतील.
'भारत जोडो' यात्रेला मिळणाऱ्या उस्फूर्त प्रतिसादाचे वास्तव पाहणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून ही नोकरभरतीची अवास्तव घोषणा करून यात्रेला प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. प्रत्यक्षात एका गाजलेल्या नाटकातील 'पाऊस विकत' असल्याचे सांगून लोकांची निव्वळ फसवणूक करणाऱ्या माणसाची ही राजकीय आवृत्ती म्हणाली लागेल, असा हल्लाबोल काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.