चेन्नई : तमिळनाडूतील विशेष न्यायालयानं माजी समाजकल्याण मंत्री आर. इंदिरा कुमारी, त्यांचे पती व एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला निधीच्या अपहाकप्रकरणात दोषी धरले आहे. न्यायालयानं तिघांनाही पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळं तमिळनाडूतील राजकारणात खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री इंदिरा कुमारी या 1991-96 या कालावधीत अण्णाद्रमुक सरकारमध्ये मंत्री होत्या. 1997 मध्ये त्यांच्यासह त्यांचे पती बाबू व इतर काही जणांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. एका ट्रस्टची स्थापना करून त्यांनी पैशांची लूट केल्याचा दावा फिर्यादींनी तक्रारीत केला होता.
आरोपींनी शासकीय निधी शाळांसाठी वापरल्याचे कागदपत्रे तयार केली होती. पण प्रत्यक्षात अशी कोणत्याही शाळाच सुरू नसल्याचे तपासात पुढे आले. यातून सरकारचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात 2004 मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मागील 17 वर्ष हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं.
अखेर बुधवारी न्यायालयानं या प्रकरणात अंतिम निकाल देत इंदिरा कुमारी, त्यांचे पती व एका आयएएस अधिकाऱ्याला दोषी धरत पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी इंदिरा कुमारी न्यायालयातच उपस्थित होत्या. शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आल्याचं समजतं.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी वेंकटकृष्णन यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. तर आणखी एक आरोपी किरूबाकरण यांचं यापूर्वीच निधन झालं आहे. इंदिरा कुमारी यांनी 2006 मध्ये डीएमके मध्ये प्रवेश केला होता. सध्या तमिळनाडूत याच पक्षाची सत्ता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.