
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सतत विषारी होत गेलेल्या राजधानी दिल्लीतील प्रदूषित हवेची गुणवत्ता आज (ता.७ नोव्हेंबर) सकाळी किंचित सुधारली. त्यानंतर दिल्ली सरकारने प्रदूषणामुळे घातलेले निर्बंध आजपासून मागे घेण्यात आले. त्यानुसार दिल्लीतील प्राथमिक शाळा पूर्ववत सुरू करण्याचा आदेश देण्यात आला असून राज्य सरकारी कर्मचार्यांसाठीचा ५० टक्के वर्क फ्रॉम-होम चा आदेश रद्द करण्यात आला आहे. (Delhi pollution Latest News)
आज सकाळी दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३५२ होता व हे प्रमाणही 'अत्यंत खराब' श्रेणीत मोडते. आज सकाळी नोएडामधील एक्यूआय ३३१ तर गुरुग्राम (हरियाणा) मध्ये तो ३०९ इतका नोंदवला गेला. कालच्या दिवसभरात दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत काही प्रमाणात सुधारणा झाली असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे.
दुसरीकडे पंजाब व शेजारच्या राज्यांत उघड्यावर तणे म्हणजेच पराली जाळण्याच्या घटनांमध्येही लक्षणीय घट झाल्याचे सांगण्यात आले. दिल्लीचा एक्यूआय ४०० ते ५०० वरून आज सकाळी ९ ला केलेल्या मापनानुसार ३५० च्या घरात आला. हा एक्यूआय देखील श्वास घेण्यासाठी घातक मानला जातो. मात्र हवेची गुणवत्ता सतत सुधारत चालल्याने दिल्ली सरकारने विविध प्रतिबंध हटविण्याचा निर्णय जाहीर केला.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की सरकारी कर्मचाऱयांसाठी घरून काम करण्याचा आदेश (वर्क फ्रॉम होम) रद्द करण्यात आला असून आजपासून (सोमवार) सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली. बी.एस ६ प्रमाणित नसलेल्या डिझेल वाहनांवर बंदीही उठवण्यात आली आहे. शहरातील हवेचा दर्जा सुधारल्याने महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल आदी बांधकामांवरील निर्बंध अंशतः उठवण्याची घोषणाही पर्यावरण मंत्र्यांनी केली. दिल्लीत आजपासून ट्रक्सच्या प्रवेशालाही परवानगी देण्यात आली आहे. प्राथमिक शाळाही पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिल्लीतील एक्यूआय मागील गुरुवारी 'गंभीर' श्रेणीमध्ये म्हणजे ४५० च्या पुढे पोहोचला. हवेतील स्मॉगच्या दाट थरामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे यासारखे विकार उद्भवले. या प्रदूषणाची सर्वत्र चर्चा सुरू होताच राज्य प्रशासनाने प्राथमिक शाळा बंद ठेवणे, डिझेल वाहनांवर बंदी घालण्यासह विविध खबरदारीचे उपाय जाहीर केले.
मात्र काल रात्रीपासून दिल्लीतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊ लागले. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये शेतातील काडीकचरा जाळण्याच्या घटना कालच्या दिवसापर्यंत २८१७ वरून ५९९ पर्यंत घटल्या आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर या हवामान अंदाज वर्तविणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील २.५ पीएम प्रदूषकांमध्ये पराली जाळण्याचे प्रमाण शनिवारी २१ टक्के होते. ते रविवारी १८ टक्क्यांवर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.