नवी दिल्ली : मतदान आहे, म्हणून सुट्या टाकणे व प्रत्यक्षात मतदानाला दांडी मारून ‘एन्जॉय' करणे असे करणाऱ्यांवर ‘लक्ष' ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) सक्रिय पावले उचलली आहेत. आगामी गुजरात निवडणुकीपासून व खासगी क्षेत्रापासून याची सुरवात होणार आहे.
कर्मचाऱ्यात मतदान करण्याची जाणीव जागृती वाढवण्यासाठी गुजरातेतील आघाडीच्या एक हजारहून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर निवडणूक आयोगाने परस्पर सामंजस्य करार (एमओयू) केले असून ‘या उद्योगांतील लाखोंपैकी जे कर्मचारी मतदानाला दांडी मारतील त्यांची नावे कंपनीच्या संकेतस्थळांवर आणि सूचना फलकावर लिहिली जातील, अशी तरतूद या करारात आहे. (Election Commission Latest News)
सुरूवातीच्या टपप्यात मतदान न करणाऱ्यावर कारवाईची शक्यता नाही. मात्र पुढील टप्प्यात जेव्हा शहरी भागातील मतदानाबाबतच्या ‘साक्षर' उदासीनतेची मोठ्या संख्येने उदाहरणे समोर येतील तेव्हा कारवाई अध्याऋत राहील, असे संकेतही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सध्या तरी या कंपन्यांना मतदानाबाबत जागृती करण्यासाठी प्रत्येकी एका नोडल अधिकाऱयाची नियुक्ती करण्यास सांगण्यात आले आहे. गुजरात निवडणूक पार पडल्यावर मतदानाला टाळाटाळ करणाऱयांना 'कृपया पुढच्या वेळी प्रयत्न करा' असे समजावण्यासाठी खुद्द आयोग पुढाकार घेणार आहे.
मतदानाबाबत शहरी उदासीनतेवर आयोग गांभीर्याने लक्ष केंद्रित करत असून २०१९ ची निवडणूक पाहिली तरी शहरांत मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असणे चिंताजनक असल्याचे मत निवडणूक आयुक्त ए.सी. पांडे यांनी नुकतेच मांडले होते. २०१९ मध्ये सर्वात कमी मतदान टक्केवारी असलेल्या सात जिल्ह्यांत चार महानगरे होती. आयोगाने आतापावेतो गुजरातमधील २३३ कंपन्यांबरोबरचे करार पूर्ण केले आहेत.
निवडणुकीपर्यंत किमान एक हजार पेक्षा जास्त कंपन्यांबरोबरचे करार करण्याचे आयोगाचे उद्दिष्ट आहे. गुजरातेत १०० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांबरोबरच राज्य सरकारच्या विविध विभागांतही मतदान जागृतीसाठी एकेक नोडल अधिकारी नेमण्यास आयोगाने सांगितले होते. जे मतदान करणार नाहीत त्यांना आयोगाच्या वतीने ‘पुढच्या वेळी नक्की मतदान करा,‘ अशी जागृती मोहीम राबविण्यात येईल. शिवाय मतदान न करणाऱ्यांची यादी कंपन्या व मंत्रालयांच्या संकेतस्थळावर आणि सूचना फलकांवर लिहीली गेली की त्यचाही मोठा परिणाम होईल,असा विश्वास आयोगाला वाटतो.
दरम्यान राजकीय निरीक्षकांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले आहे. गेल्या किमान ५ लोकसभा निवडणुकांचे सक्रिय वृत्तांकन करणारे पत्रकार सईद अंसारी यांच्या मते मतदानाला टाळाटाळ करणे व त्यासाठी म्हणून दिलेली सुटी मतदान न करता इतर कामांसाठी वापरणे हा लोकशाहीत गुन्हाच आहे. सर्वच क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना नवीन नियम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काटेकोरपणे लागू केला पाहिजे, असेही मत अंसारी यांनी व्यक्त केले.
गुजरातची घोषणा लवकरच?
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच केली. मात्र त्याच सुमारास कालावधी संपणार असलेल्या गुजरातच्या निवडणूक तारखा घोषित करणे टाळले. त्यावरून आयोग टीकेच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, २०१७ मध्येही असेच झाले होते, असा खुलासा केला. केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरातमधील मतदान तयारीचा आढावा घेण्यासाठी त्या राज्याच्या दोऱ्यावर आहे. दिल्लीत परतल्यावर या आठवड्यातच गुजरातच्या निवडणूक वेळापत्रकाची घोषणा होण्याची चिन्हे आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.