नवी दिल्ली : येथे (भारतात) बसून, तुम्ही हे करायला हवे होते, ते करायला हवे होते, असे बोलणे सोपे आहे. पण युध्दग्रस्त युक्रेनमध्ये (War) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर (Indian Students) कोणती आपत्ती कोसळली होती व त्यांची मानसिकता तेव्हा काय होती हेही समजून घ्या. रशियाने प्रत्यक्ष हल्ले सुरू केले तरी तेथील राष्ट्राध्यक्ष व सरकार 'ऑल वेल' चा व देश सोडू नका, हा संदेश देत होते व अनेक विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे भारताने अत्यंत धैर्यपूर्वक ऑपरेशन गंगाची अंमलबजावणी केली व करत आहे, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी राज्यसभेत विरोधकांच्या शंकांना उत्तर दिले. युक्रेनमधे (Ukraine) अडकलेल्या २२,५०० हून जास्त विद्यार्थ्यांना भारतात सुखरून परत आणले असून बहुतांश भारतीयही लवकरच मायदेशी परततील. यानंतर भारत या समस्येबाबत जागतिक स्तरावर आपली 'कूटनीती' वापरेल, असेही जयशंकर म्हणाले.
जयशंकर यांनी रशिया-युक्रेनबाबत निवेदन केल्यावर राज्यसभेच्या विशेषाधिकारानुसार विरोधी पक्षीय खासदारांनी आपल्या शंका मांडल्या. मल्लिकार्जुन खर्गे, आनंद शर्मा, सतीश मिश्रा, रामहोपाल यादव, सुश्मिता देव,जॉन ब्रेटस्, थिरूची सिवा, वायको आदींनी सरकारला विविध सूचना केल्या. त्यातील राजकीय आशय असणाऱ्या सूचनांना जयशंकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर केले. भारताने या युध्दात जी भूमिका घेतली तिचे देशातील बहुतांश राजकीय पक्ष व खासदारंनी समर्थन केले आहे, असे सांगून जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन व युक्रेनचे जेलेन्स्की यांच्याशी दीर्घ चर्चा केली व दोघांनाही युध्दविराम करण्याचेच आवाहन केले. दोनदा युध्दविरामही झाला.
युक्रेनमधील परिस्थिती गंभीर बनली तेव्हाही तेथे १८००० भारतीय विद्यार्थी अडकलेले होते. युक्रेनमधील परिस्थितीचे गांभीर्य कळल्यानेच भारताने तेथील दूतावासामार्फत जानेवारी २०२२ पासूनच दिशानिर्देश जारी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर १५, २० व २२ फेब्रुवारीला सलगपणे दिशानिर्देश जारी केले. दूतावासाने असे दिशानिर्देश ही अत्यंत गंभीर बाब असते. त्यानंतर ४ हजार विद्यार्थी वेळीच भारतात परतले. मात्र, रशियाकडून लष्करी कारवाईला प्रत्यक्ष सुरूवात झाली तेव्हा बाकीचे अडकले. मार्शल लॉ लागू असतानाही युक्रेनमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था यांनी रात्रंदिवस कष्ट करून भारतीय विद्यार्थ्यांच्या माघारी येण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न केले व करत आहेत.
जयशंकर म्हणाले की, तेथील विद्यापीठांनी भारतीय विद्यार्त्यांबाबत अत्यंत प्रतीकूल भूमिका घेतली. ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यास नकार, परत गेलात तर पुन्हा प्रवेश देणार नाही,अशा धमक्या देणे असे सांगून विद्यापीठांनी आपल्या विद्यार्थ्यांना नाऊमेद केले. कोणता विद्यार्थी असे शिक्षण अर्धवट सोडून परत येईल? त्यात जेलेन्स्की यांनी, काही चिंता करू नका, असे दूरचित्रवाणीवर सारखे सांगणे सुरू ठेवले होते. त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला यात त्यांची काहीही चूक नाही.
युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यही महत्वाचे आहे. ऑनलाईन शिक्षण, किंवा त्यांच्या येथील वैद्यकीय शिक्षण प्रक्रियेतील समावेशाबाबत मोदी सरकार गंभीरपणे विचार करत आहे. लवकरच त्यावरही मार्ग काढता येईल. मात्र तो माझ्या मंत्रालयाचा विषय नसल्याने विस्ताराने बोलत नाही,असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.