थरारक : शेतकऱ्यांना चिरडत वाहनांचा ताफा निघून गेला...व्हि़डीओ व्हायरल

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या वाहनांच्या ताफ्याने रविवारी (ता.3) आठ जणांना चिरडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.
Lakhimpur Kheri
Lakhimpur Kheri

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेबाबत अनेक तर्क लढवले जात असतानाच एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडत वाहनांचा ताफा निघून गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या वाहनांच्या ताफ्याने रविवारी (ता.3) आठ जणांना चिरडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यात चार शेतकरी (Farmers) आणि भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र, गृहराज्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावत आपला मुलगा तिथे उपस्थित नव्हता असं म्हटलं आहे. त्यानंतर या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच शेतकरी संघटनांच्या आयटी सेलने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Lakhimpur Kheri
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सुनावणीवेळी आठवले लोकमान्य टिळकांचे 'ते' शब्द...

शेतकरी आंदोलन करत असताना वाहनांचा ताफा त्यांच्या अंगावरून पुढे गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानं शेतकरी संघटनांमधील रोष आणखी वाढला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही हा व्हिडीओ शेअर करत अजूनही शेतकऱ्यांना चिरडणारा व्यक्तीला अटक का केली नाही, असा सवाल मोदी सरकारला केला आहे. तसेच इतर नेत्यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, लखीमपूर खिरीतील घटनेमुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले जात आहे. पोलिसांनी लखीमपूर खिरीमध्ये जमावबंदी लागू केली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर या प्रकरणी न्यायिक चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com