सुपर मार्केटबाहेर रांगेत उभा असतानाच भारतीय विद्यार्थ्यावर काळ कोसळला!

रशियाने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकीव्हमध्ये रोजदार हल्ला चढवला आहे.
Naveen Shekharappa Gyanagoudar
Naveen Shekharappa GyanagoudarSarkarnama

नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकीव्हमध्ये (Kharkiv) जोरदार हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचे नाव नवीन शेखरप्पा ग्यानगौडर (Naveen Shekharappa Gyanagoudar) असल्याची प्राथमिक माहिती आहे. नवीन बावीस वर्षांचा होता. युक्रेनमधील (Ukraine) खारकीव्ह या शहरात तो वैद्यकीय पदवीचे चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता.

कीवमधून (Kyiv) तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दुतावासाकडून (Indian Embassy) अडकलेल्या भारतीय नागरिकांना मंगळवारी दुपारी बारा वाजता करण्यात आले आहे. पण त्याआधीच सकाळी खारकीव्हमध्ये नवीनचा मृत्यू झाल्याचे समजते. रशियाच्या बॉम्बहल्ल्याचा नवीन बळी ठरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, नवीन हा एका सुपर मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेला होता. यावेळी सुपर मार्केटबाहेर रांग लागली होती. (Russia-Ukraine War)

Naveen Shekharappa Gyanagoudar
काहीही करा पण कीवमधून आजच बाहेर पडा; भारतीय दुतावासानं चुकवला काळजाचा ठोका

नवीन रांगेत उभा असतानाच जवळच झालेल्या बॉम्बहल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. तर खारकीवमधील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याच्या गोळीबारात नवीचा मृत्यू झाला आहे. तसेच नवीन हा रेल्वे स्थानकाकडे जात असताना त्याचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. पण रशिया-युक्रेन युध्दामध्ये भारतीयाचा हा पहिला बळी ठरला आहे. त्यामुळे भारतासाठी ही मोठी नामुष्की ठरली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही दुजोरा दिला आहे.

अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, खारकीव्ह येथे आज सकाळी बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही अतिशय दु:खदायी घटना आहे. या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात परराष्ट्र मंत्रालय आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी संपर्क साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. याचप्रकारची मागणी भारताच्या रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांनीही केली आहे.

दरम्यान, भारताने आतापर्यंत सात विमानांमधून जवळपास दीड हजार नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. तसेच जवळपास आठ हजारांहून अधिक भारतीयांना युक्रेन सोडलं आहे. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांनी सुरक्षित शहरांमध्ये जाण्याचे आवाहन यापूर्वीच दुतावासाकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच युक्रेन सरकारने पश्चिम भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. पण आता दुतावासाच्या आवाहनामुळे भारतीयांनाही या युध्दाचा धोका वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com