
"आम्ही कुठल्याही हिंसेचे समर्थन करीत नाहीत," असे म्हणत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने विश्व हिंदू परिषदेचे कान उपटले आहे. सध्या चर्चेत असलेला औरंगजेब कबरीचा मुद्या हा संयुक्तीक नाही, असे सांगत अप्रत्यक्षपणे आरएसएसने विहिंपच्या भुमिकेवर टीका केली आहे.
नागपूर हिंसाचारानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल यांची प्रतिक्रिया समोर आली होती . विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणीसाठी राज्यात शांतेत आंदोलन केले होते. नागपूरमध्येही शांततापूर्ण आंदोलन झाले. त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर सुनियोजितपणे हल्ला करण्यात आला, असे बंसल यांनी म्हटलं आहे.
औरंग्यांच्या मानसिकता अद्यापही आहे. या मानसिकतेला मुळापासून नष्ट करण्यासाठी आम्ही आंदोलन केले. त्यानंतर औरंग्याचे समर्थक नागपुरात एकत्र आले. त्यांनी हल्ला करण्याची योजना आखली. त्याला काही जणांनी साथ दिली. त्यामुळे नागपुरात हिंसाचार झाला, असा दावा विनोद बंसल यांनी केला आहे.
सोमवारी रात्री नागपुरात झालेल्या दंगलीचे आम्ही समर्थन करीत नाही. या घटनेचा आम्ही निषेधच करतो. औरंगजेबाचे उदात्तीकरण आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. नागपुरातील हिंसा हा नियोजित कटाचाच एक भाग होता. त्यामुळे ही हिंसा घडवून आणणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहीजे. औरंगजेबाला मानणारे लोक आजही आहेत, असे विहिंपकडून सांगण्यात आले.
आरएसएसचे मुख्यालय असलेल्या नागपुर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन आहे. दोन गटातील तणावानंतर भाजपकडे संशयाने पाहिले जात आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या केलेल्या विधानानंतर दोन समाजात तणाव निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. अशा परिस्थितीत आरएसएसने आपली भूमिक मांडत हिंदुत्वादी संघटनेचे कान टोचले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय प्रचारत सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली.