

NTA officer appointments : देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळलेली असतानाच केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षाव्यवस्थेवरील प्रश्नांवर सावरासावरी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या नियुक्त्या झाल्याने त्याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
NEET 2024 नंतर आता 2026 मध्येही पेपरफुटीच्या आरोपांमुळे केंद्रातील भाजप (BJP) मोदी सरकार आणि NTA वर टीकेची झोड उठली आहे. अशा पार्श्वभूमीवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या (ACC) मंजुरीनंतर या चार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.
NTA ही देशातील NEET, JEE यांसारख्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा घेणारी केंद्र सरकारची (Central Government) संस्था असून ती उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीत कार्यरत आहे. संस्थेच्या प्रशासकीय आणि परीक्षा व्यवस्थापनातील विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संयुक्त सचिव पदासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अनुजा बापट या 1998 बॅचच्या भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) अधिकारी असून, रुचिता विज या 2004 बॅचच्या भारतीय महसूल सेवा (IRS-C&IT) अधिकारी आहेत. दोघींनाही पाच वर्षांच्या कालावधीसाठी NTA मध्ये संयुक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
तसेच संयुक्त संचालक पदावरही दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आकाश जैन हे 2013 बॅचचे IRS-IT अधिकारी असून त्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात ‘लेटरल शिफ्ट’द्वारे NTA मध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 4 डिसेंबर 2029 पर्यंत राहणार आहे.
दुसरे अधिकारी आदित्य राजेंद्र भोजगढिया हे भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (IA&AS) मधील 2013 बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचीही सेंट्रल स्टाफिंग स्कीम अंतर्गत लेटरल शिफ्टद्वारे संयुक्त संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ 16 मे 2028 पर्यंत असेल.
या सर्व नियुक्त्यांना अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेट (ACC) यांनी मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत निर्णय घेणारी ही सर्वोच्च समिती मानली जाते आणि त्यामध्ये पंतप्रधान Narendra Modi यांची महत्त्वाची भूमिका असते.
दरम्यान, NEET पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहारांवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी केंद्र सरकारच्या कार्यकाळात देशात 148 परीक्षा घोटाळे झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या आरोपानुसार, 87 परीक्षा रद्द कराव्या लागल्या असून जवळपास नऊ कोटी विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम झाला.
राहुल गांधी यांनी पुढे असा आरोप केला की, परीक्षा घोटाळ्यांतील 17 प्रकरणांमध्ये CBI आणि 11 प्रकरणांत ED चौकशी झाली, मात्र अद्याप कोणत्याही आरोपीला शिक्षा होऊ शकलेली नाही. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारसमोर उभे ठाकले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.