लखनौ : उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या (Congress) अडचणी कमी होताना दिसत नाहीत. काँग्रेसने सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) संपूर्ण जबाबदारी टाकली आहे. पण निवडणुकीआधीच त्यांच्या मोहरे हातातून निसटू लागल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे दिग्गज उमेदवारच आता साथ सोडत इतर पक्षांची ताकद वाढवताना दिसत आहेत. आतापर्यंत तिघांनी पक्षाची उमदेवारी नाकारत इतर पक्षांचे तिकीट मिळवले आहे. (UP Election Update)
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) काँग्रेसची स्थिती फारशी चांगली आहे. राज्यात पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रियांका यांनी खूप मेहनत घेतली आहे. पण निवडणुकीआधी सुरू असलेली पडझड अजूनही थांबलेली नाही. तिकीट जाहीर झाल्यानंतर तीन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने आता उमेदवारी निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. काँग्रेसची पोस्टर गर्ल (Poster Girl) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका मौर्य यांनीही त्यावरच बोट ठेवत पक्ष सोडला आहे. (UP Election 2022)
तिकीट जाहीर झाल्यानंतर सर्वात आधी रामपुरमधील चमरौआ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युसूफ अली यांनी पक्ष सोडला. त्यानंतर याच जिल्ह्यातील स्वार-टांडा मतदारसंघातील हैदर अली खान उर्फ हमजा मियां यांनी साथ सोडली. त्यानंतर बरेली कैंट येथील उमेदवार सुप्रिया ऐरन यांनी पक्षाल सोडचिठ्ठी दिली. तिघेही उमेदवारांची त्यांच्या भागात मोठा दबदबा आहे. पक्षाला अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवून दिला होता.
तिघांचीही नावे काँग्रेसच्या पहिल्याच उमेदवारी यादीत होती. हमजा मियां यांनी अपना दल (एस) मध्ये प्रवेश करत त्यात मतदारसंघातून तिकीट मिळवलं. ते रामपुरच्या माजी खासदार बेगम नूरबानों यांच्या नातू आहेत. हमजा यांचे वडील काजिम अली माजी मंत्री होते. काजिम अली हे रामपुर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत. चमरौआ मतदारसंघातील युसूफ अली यांनी समजावादी पक्षात प्रवेश केला आहे.
बरेलीतील सुप्रिया ऐरन या काँग्रेसचे माजी खासदार प्रविण सिंह ऐरन यांच्या पत्नी आहेत. दोघांनीही समाजवादी पक्षात प्रवेश करत तिकीट मिळवलं आहे. प्रियांका गांधी यांनी त्यांना तिकीट दिले होते. सुप्रिया या बरेलीच्या महापौरही होत्या. तीनही बड्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. याचा जोरदार फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
यावर बोलताना प्रवक्ते जिशान हैदर म्हणाले, विरोधकांना घाबरणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असं प्रियांका गांधी यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. आम्ही राज्याच्या विकासासाठी लढत आहोत. अखेरपर्यंत लढत राहू. आम्ही कोणत्याच नेत्याला इतर पक्षात जाण्यापासून रोखणार नाही. दलबदलू नेत्यांची पक्षाला गरज नाही. ते आज काँग्रेसमध्ये, उद्या भाजपमध्ये तर नंतर सपा-बसपामध्ये जातील. अशा नेत्यांची काहीच किंमत राहत नाही, अशी टीका हैदर यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.