बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म 1996 साली मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग आहे.
तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचं बालपण अत्यंत गरीबीत गेलं. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे.
जसं शिक्षण सुटलं, तसं धीरेंद्र महाराजांनी आपल्या आजोबांप्रमाणेच आपलाही दरबार भरवायला सुरुवात केली. अवघ्या सोळा-सतराव्या वर्षी धीरेंद्र महाराज लोकांच्या समस्यांच्या निराकरणाचा दावा करु लागले.
सोबत रामकथा असल्याने रामभक्तांची गर्दी होऊ लागली. गर्दी वाढू लागली आणि धीरेंद्र महाराजांचे दरबार देशभरात होऊ लागला.
2016 मध्ये त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने ज्योतिर्लिंग असलेल्या त्यांच्या गावातील सर्वात जुन्या मंदिरात यज्ञाचे आयोजन केले. या मंदिरात महाराजांची मूर्ती बसवण्यात आल्याने हे ठिकाण 'बागेश्वर धाम' म्हणून ओळखले जाऊ लागले.
श्रीबालाजी महाराजांच्या या मंदिराच्या मागे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आजोबा सेतुलाल गर्ग संन्यासी बाबा यांची समाधी आहे. जेव्हा धीरेंद्र शास्त्रींनी येथे कथन सुरू केले तेव्हा लोक या बागेश्वर मंदिराला बागेश्वर धाम म्हणू लागले. आज हजारो लोक येथे दर्शनासाठी येतात.
जगभरातून लोक आपल्या समस्या घेऊन धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धामवर पोहोचतात, असा दावा केला जातो. या दरबारात येणाऱ्या लोकांचे विचार धीरेंद्र शास्त्री एका कागदावर आधीच लिहून ठेवतात, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित होतात.
उपस्थितांमधल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांना मंचावर बोलवायचं. त्यांची समस्या काय आहे, हे एका कागदावर लिहून दाखवायचं आणि त्या समस्येवर उपायही सांगायचा. हे महाराज लोकांच्या अंगातली भुतंही उतरवतात, असा दावा केला जातो.
कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे सध्या बागेश्वर महाराज प्रचंड चर्चेत आहेत.