
बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले, ’शिवरायांचा अपमान भाजप सरकारच घडवून आणतंय की काय अशी शंका यायला लागली आहे. एखाद्या वेळेस आता यांना फटकावलं पण पाहिजे, आता फक्त कमेंट करून, निषेध करून आणि सोशल मीडियावरच बोलून,शांत बसून चालणार नाही. आता हे झोडावेच लागणार असल्याचं म्हटलं आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुनगंटीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आपल्या पक्षांचे सर्वोच्च नेते आहेत. अशा नेत्यांना गुप्तपणे बैठक घेण्याची काहीच गरज नाही. भेट घ्यायची असेल, तर ती छातीठोकपणे आणि उघडपणे घेतील. हे दोन्ही नेते पराक्रमी आहेत. त्यांना गुप्त बैठका घेण्याची आवश्यकता नाही. अशाप्रकारच्या अफवा पसरवून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.
शनिवारी सायंकाळी पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यांवर एक सिनेमासारखा थरार अनुभवायला मिळाला. मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने पीएमपीएमएल बस थेट चोरून ड्राईव्हिंग सुरू केली आणि जंगली महाराज रस्त्यावरून गुडलक चौक पर्यंत भरधाव नेली. पण पोलिसांच्या सतर्क डोळ्यांनी आणि झटपट पाठलागाने हा ‘बस हायजॅक’चा ड्रामा अवघ्या काही मिनिटांत संपुष्टात आणला.
बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आज तापमानाने उच्चांक गाठला. बुलढाणा शहरात 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर खामगाव शहरात तब्बल 43.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पश्चिम विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगे याचा फास आणखी अवळला जाण्याचे चिन्ह आहेत. पोलिस तपासात गडगेच्या 13 मालमत्ता उघड झाल्या असून अहिल्यानगर, राहता, नेवासा याठिकाणी देखील त्याची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
डोंबिवलीत जत्रेसाठी बकरा दिला नाही म्हणून एका कुटुंबातील तीन लोकांना काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण करण्यात आली होती. जखमींमध्ये एका वयोवृद्ध महिलेच्या देखील समावेश होता. या घटनेच्या व्हिडिओ चांगलाच वायरल झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणात सुजल भोसले आणि रोहित ढेंबे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींच्या शोध सुरू आहे.
शक्तीपीठ करणार हा अट्टाहास असेल तर प्रसंगी कायदा हातात घेऊन, तो मोडून काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा आपला ड्रिम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहतायत, देवस्थानाच्या नावाखाली हा रस्ता होतोय. पण त्या देवस्थानांना आधीच रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याची आवश्यकता नाही, असे देखील माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीच्या ईश्वरपूर येथे पार पडलेल्या शक्तीपीठ विरोधी जन आक्रोश मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
जालन्यात वंचित बहुजन आघाडीकडून शिवाजी कोण होता पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलंय. जालना महानगरपालिकेतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं आहे .शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना तडीपार करा अशी मागणी यावेळी जालन्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केली. अनपढ लोक शिवाजी कोण होता या पुस्तकाला विरोध करत आहे, हे पुस्तक न वाचता नाव ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील डेव्हिड घुमारे यांनी म्हटलंय.
जालन्यातील बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत तब्बल 7 कोटी 31 लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला, या प्रकरणी पोलिसांच्या हाती बँकेतील एक सीसीटीव्ही फुटेज आले असून यात बँक अधिकारीच सोन्याच्या दागिन्यांची चोरी करताना समोर आलाय, स्ट्राँग रूम मधील तिजोरीतील सोन्याचे दागिने हे बॅक अधिकारी काढताना cctv मध्ये दिसत आहे.. आरोपींनी या बँकेत बनावट सोने तारण ठेवून तसेच ओरिजनल सोने चोरून जवळपास 7 कोटी 31 लाख रुपयांचा अपहार केलाय
जी माणसं घरात बसली होती, ज्यांचं राजकारण फुलस्टॉप झालं आहे. मला राज ठाकरेंचं नाव घ्यायचं नाही. अशा लोकांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘ऑफ सिझन’मध्ये बोलण्यासाठी रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून विषय उपलब्ध करून दिला आहे. सरनाईक हे शिवसेनेला बॅकफूटवर नेत आहेत. त्यांच्या भूमिकेला शिवसेनेतून कोणाचे समर्थन आहे, असा सवालही ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर येत्या २८ एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समज दिल्यानंतरही आंबी यांनी गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
आम आदमी पक्षात काम करण्यासाठी जागा राहिलेले नाही. आप आता चुकीच्या रस्त्याने जात असल्याने त्या पक्षासोबत आता कोणीही आपले संबंध ठेवू इच्छित नाही. आम्ही भिऊन नाही तर वैतागून पक्ष सोडून गेलो आहोत. दिल्ली विधानसभा निवडणूक हरण्याचे मुख्य कारण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान शिशमहल होता, असा दावा खासदार राघव चढ्ढा यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून तब्बल २१ लाख ५० हजार किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत २५ ते ३० जणांना ड्रग्ज विक्री केल्याचे आढळून आले आहे.
आम आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेणारे खासदार हरभजन सिंग यांच्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी जालंदरमधील हरभजन सिंग याच्या घरावर गद्दार असे लिहिले आहे, त्यामुळे पंजाबात वातावरण तापले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत अशा प्रकारची शिवराळ भाषा अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गायकवाडांना समज देण्यात आल्याचे सांगितले असून, भविष्यात संयमित भाषा वापरण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकमधील नियोजित दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भातील महत्त्वाची बैठक तसेच पुरोहित संघासोबतची बैठकही रद्द करण्यात आली आहे.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी सौ. आदिती राहुल ढिकले यांचे निधन झाले आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती असून नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यदर्शनासाठी जाणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महंत हरिगिरीजी महाराज (जुना आखाडा), महंत रविंद्रपुरीजी महाराज (निरंजनी आखाडा), महंत शंकरानंद (आनंद आखाडा), महंत गिरिजानंद, महंत रामकृष्ण लहवितकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार हिरामण खोसकर, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह मंदिर देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दर्शन घेऊन पूजा केली. मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्याधिकारी योगेश जाधव, कैलास घुले, मनोज थेटे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार केला.
राज्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित भेटीच्या चर्चेने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. या कथित भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्हाला लपून छपून भेटायची गरज नसल्याचे म्हणत भेटीचे वृत्त फेटाळून लावलं. तर कथित भेटीची बातमी देणाऱ्या वृत्तसंस्थेला नोटीस पाठवणार असल्याचेही स्पष्ट केले.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आमदी पक्षाला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. आपच्या राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. आपची साथ सोडतानाच राज्यसभेत आम आदमी पक्षाचे भाजपात विलीनीकरण करण्यात आलं आहे. तशी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. परंतु आपने याला नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. 'आप'चे राज्यसभा प्रतोद एन. डी. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ते राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या विरोधात राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र सादर करणार आहेत. या तिन्ही नेत्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे 'आप'चे राज्यसभा प्रतोद या तिन्ही खासदारांविरुद्ध तक्रार दाखल करतील. हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता यांनी अद्याप भाजपमध्ये सामील झाल्याचे जाहीर केलेले नाही.
भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाल्याची माहिती Reserve Bank of India ने जाहीर केली आहे. 17 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 2.3 अब्ज डॉलर्सने वाढून 703 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे.
परकीय चलन मालमत्ता : 1.48 अब्ज डॉलर्सने वाढून 557 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त
सोन्याचा साठा : 790 दशलक्ष डॉलर्सने वाढून 122 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त
SDR (Special Drawing Rights) : 18.84 अब्ज डॉलर्स
IMF मध्ये भारताची स्थिती : 4.87 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ
राज्यात 1 मे रोजी पासून म्हणजेच, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. यावरून वाद पेटला आहे. मनसे यावर आक्रमक असून, या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, यासाठी मैदानात उतरली आहे. "आम्हाला बघायचं आहे, मुंबई बंद करण्याची ताकद भैय्यांमध्ये आहे का? मराठी बऱ्याच लोकांना येते, शशांक राव यांना प्राॅब्लेम काय आहे. अटक वगैरे आम्हालाच करतात, मात्र निरुपम वगैरे यांना सूट दिली आहे. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. दिघे साहेब असते तर निरुपम यांच्या कानाखाली मारली असती. तेच एकनाथ शिंदे यांनी करावं ही अपेक्षा आहे," असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला आहे.
आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड हा कारच्या बोनेटवर उभं राहून विरोधकांना अश्लील शिवीगाळ करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नगरपरिषद निवडणुकीदरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र पुन्हा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात नेटकऱ्यांमध्ये चांगलाच संताप कमेंटच्या माध्यमातून निघत आहे. कुणाल गायकवाड हा बुलढाणा नगरपरिषदेचा सदस्य असून नगर परिषदेतील गटनेता सुद्धा आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाई करत त्यांचा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत हा परवाना रद्द करण्यात आला असून, आता ही बँक भारतात बँकिंग व्यवहार करण्यास पात्र राहणार नाही. आरबीआयने आपल्या आदेशात या कारवाईमागील स्पष्ट कारणे नमूद केली आहेत. बँकेचे कामकाज आणि व्यवस्थापन हे ठेवीदारांच्या हितासाठी नुकसानकारक असल्याचे आरबीआयला आढळून आले. पेमेंट बँक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या अटींचे पालन करण्यात बँक वारंवार अपयशी ठरली.
देशात खतांच्या तुटवड्याबाबत सुरू असलेल्या वादात काँग्रेसचे अध्यक्ष Mallikarjun Kharge यांनी केलेला दावा केंद्रीय रसायन आणि खत मंत्री J. P. Nadda यांनी फेटाळून लावला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून देशभरातील गरजेनुसार खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नड्डा यांनी स्पष्ट केलं. खर्गे यांचं वक्तव्य राजकीय हेतूनं प्रेरित असून ते शेतकरी आणि उत्पादकांची दिशाभूल करणारं असल्याची टीका त्यांनी केली. तसंच, अस्तित्वात नसलेली भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत, जागतिक किमतींमधील चढ-उतारांपासून भारतीय शेतकऱ्यांना सरकारनं संरक्षण दिलं असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खतांचा साठा अधिक असल्याचंही त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं.
कर्नाटक सरकारने राज्यातील अनुसूचित जातीच्या (SC) 15% आरक्षणाचे अंतर्गत वर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत या नव्या फॉर्म्युल्यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाची विभागणी तीन मुख्य श्रेणींमध्ये करण्यात आली आहे.
श्रेणी 1 (Category 1): 5.25% आरक्षण (मादिगा आणि संबंधित जाती/दलित डावे).
श्रेणी 2 (Category 2): 2.25% आरक्षण (होलेया आणि संबंधित जाती/दलित उजवे).
श्रेणी 3 (Category 3): 4.5% आरक्षण (भोवी, लमाणी, कोरमा, कोराचा आणि 59 भटक्या जमाती).
राज्यातील रिक्षा-टॅक्सीसह सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषा शिकावीच लागेल. मी मराठी शिकणार नाही, अशी मुजोरी त्यांनी केल्यास ती सहन केली जाणार नाही, त्या वाहनचालकाचा परवाना रद्द केला जाईल, असा खणखणीत इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.