
Anandacha Shidha Yojana: अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील गरीब व होतकरू जनतेसाठी सणांना आनंदाचा शिधा दिला जात होता पण यंदा गणपतीला मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ मिळालाच नाही, हा शिधा दिवाळी तरी मिळेल, अशी आशा लाभार्थ्यांना होती, पण आता दिवाळी सुरु होण्यास 12 दिवस शिल्लक असताना'आनंदाचा शिधा' मिळणार नसल्याचे चित्र आहे.
आनंदाचा शिधा वाटपाबाबत सरकारी पातळीवर कुठलीही हालचाल दिसत नाही. लाडकी बहीण योजनेसाठी अन्य योजनांवर ताण पडत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अन्य योजनांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
राज्यातील गोरगरिब जनतेला सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती. पण यंदाच्या दिवाळीत ही योजना 'फुसका बार' निघण्याचे चित्र आहे. या योजनेचा खर्च 500 कोटी रुपये होता आणि सरासरी 1.6 कोटी लाभार्थी होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत, असे अनेकदा जाहीर केले असतानाही या योजनेबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसापूर्वी विरोधकांनी शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधासह इतर योजना बंद होणार असल्याचा आरोप केला होता, हा आरोप खरा ठरणार का?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज यांसह काही मोजक्या योजना सोडल्या, तर अनेक योजनांसाठी निधी देण्यासाठी सरकार आखडता हात घेत आहे. शिवभोजन थाळी योजनाही बंद पडली आहे, त्यानंतर आता आनंदाचा शिक्षा ही योजनाही केवळ कागदावर राहिली असल्याचे दिसते.
सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज यासह विविध योजना जाहीर केल्या होत्या. राज्याच्या तिजोरीवर एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा भार आला आहे.
महसूलात येणारी तूट भरून काढून राज्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात कठोर निर्णय घेण्यात येतील, असे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यांची अमलबजावणी आता सुरु झाली आहे, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
तिजोरी खळखळाट असल्याचे सरकारने काही योजनांना कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना मिळणारा 'आनंदाचा शिधा'मिळणार नसल्याचे दिसते.
आनंदाचा शिधा योजनेची घोषणा सर्वप्रथम 2022मध्ये दिवाळीच्या तोंडावर करण्यात आली होती.
केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना 100 रुपये या सवलतीच्या दरात चार पदार्थ देण्यात आले होते.
किटमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ आणि साखर, तसेच एक लिटर सोयाबीन तेल समाविष्ट होते.
2023मध्ये गुढी पाडवा आणि आंबेडकर जयंती,गणेशोत्सव, दिवाळीच या प्रकारचे किट वाटले होते.
2024मध्ये अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त तसेच गणेशोत्सवादरम्यान देखील हे किट वाटण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.